धारूरमध्ये उपचाराअभावी बालकाचा मृत्यू
By Admin | Updated: August 12, 2015 01:00 IST2015-08-12T00:37:57+5:302015-08-12T01:00:35+5:30
धारूर: येथील ग्रामीण रूग्णालयात एका १२ वर्षीय मुलास उपचार न मिळाल्यामुळे त्यास अंबाजोगाई येथे उपचारार्थ नेत असताना वाटेतच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली.

धारूरमध्ये उपचाराअभावी बालकाचा मृत्यू
धारूर: येथील ग्रामीण रूग्णालयात एका १२ वर्षीय मुलास उपचार न मिळाल्यामुळे त्यास अंबाजोगाई येथे उपचारार्थ नेत असताना वाटेतच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. यामुळे ग्रामीण रूग्णालयाच्या कारभारावर रोष व्यक्त करण्यात येत आहे.
शिवम महारूद्र पोटभरे असे त्या बालकाचे नाव आहे. तो शहरातील झोपडपट्टी भागातील रहिवाशी होता. मंगळवारी पहाटे तीनच्या सुमारास उलट्या होऊ लागल्या. त्यामुळे घराजवळच असलेल्या ग्रामीण रूग्णालयात कुटुंबियांनी त्याला दाखल केले. पुढील उपचारासाठी त्याला अंबाजोगाईला घेऊन जा, असे दवाखान्याकडून सांगण्यात आले. त्यामुळे नातेवाईकांनी त्याला अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रूग्णालयात घेऊन जात असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे नातेवाईक परत आले. त्यांनी या बालकाच्या मृत्यूसाठी डॉक्टर व कर्मचारी दोषी असल्याचा आरोप त्यांनी केला. रूग्णालयात मोठा जमाव जमा झाला होता.
या बालकाच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी संतप्त कुटुंबियांनी केली. यामुळे येथील सर्व कामकाज ठप्प पडले होते. केज ग्रामीण रूग्णालयाचे अधीक्षक डॉ. अशोक थोरात हे तेथे दाखल झाले. त्यांनी या लोकांचे म्हणणे ऐकून घेतले. वरिष्ठांना अहवाल पाठवून दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर जमाव शांत झाला. (वार्ताहर)
धारूर ग्रामीण रूग्णालयात एकच वैद्यकीय अधिकारी असून इतर पदे रिक्त आहेत. त्यामुळे येथील व्यवस्थापन ढासळलेले आहे. परिणामी, रूग्णांचे मोठे हाल होत आहेत. याही गोष्टी विचारात घेणे आवश्यक आहे.