मुख्यमंत्री पोपटासारखे बोलून वेळकाढूपणा करताहेत : निलंगेकर
By Admin | Updated: September 4, 2015 00:29 IST2015-09-04T00:29:37+5:302015-09-04T00:29:37+5:30
लातूर : मराठवाड्यावर सलग तिसऱ्या वर्षी दुष्काळाचे सावट आहे. पावसाळ्याचे तीन महिने गेले तरी पाऊस नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मात्र पाहणी करुन फक्त

मुख्यमंत्री पोपटासारखे बोलून वेळकाढूपणा करताहेत : निलंगेकर
लातूर : मराठवाड्यावर सलग तिसऱ्या वर्षी दुष्काळाचे सावट आहे. पावसाळ्याचे तीन महिने गेले तरी पाऊस नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मात्र पाहणी करुन फक्त आश्वासने देत आहेत. शेतकऱ्यांना सरसकट मदत करायची सोडून ते पोपटासारखे बोलून वेळकाढूपणा करीत असल्याची टिका माजी मुख्यमंत्री शिवाजीराव निलंगेकर यांनी गुरुवारी लातूर येथील पत्रकार परिषदेत केली.
सरकारच्या आठ महिन्याच्या काळात ५०० पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे सांगून ते पुढे म्हणाले की, २००३-०४ साली पश्चिम महाराष्ट्रात दुष्काळी स्थिती होती. त्या वेळी मी महसूलमंत्री असताना चारा छावण्या काढल्या, पिण्याच्या पाण्याचा व चाऱ्याचा प्रश्न मिटविला. एकही मोर्चा काढण्याची वेळ येऊ दिली नाही. परंतु यंदा मराठवाड्यावर ही वेळ आली तर सरकार गंभीर नाही. मुख्यमंत्री म्हणतात की, दुष्काळी स्थितीत जनावरांच्या चारा छावण्या चालविणाऱ्या पुढाऱ्यांनीच कुरण खाल्ले आहे. जनावरांना मिळाले नाही तर तेच मोठे झाले. त्यांचे हे विधान दिशाभूल करणारे आहे. तुम्ही आत्ता काय करणार आहात ते सांगा ? मुख्यमंत्र्यांना अधिकार असतात. कॅबिनेटच्या बैठकीआधीही ते घोषणा करु शकतात. परंतु मुख्यमंत्री काहीच करित नाहीत.
दुष्काळामुळे शेती करणे शेतकरी सोडून देत नाही. १९५१ साली ७२ टक्के लोक शेतीवर अवलंबून होते तर आता ५६ टक्के लोक शेतीवर अवलंबून आहेत. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवरही परिणाम झाला आहे. सरकारकडे पैसे नाहीत तर सरकारने कर्ज काढावे, वेळकाढूपणा करु नये, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)