पार्किंगच्या जागांना विळखा
By Admin | Updated: December 19, 2014 00:59 IST2014-12-19T00:12:41+5:302014-12-19T00:59:57+5:30
विकास राऊत, औरंगाबाद शहरात वाहनांची संख्या वाढत आहे. वाहन पार्क करण्यासाठी मनपाने १० वर्षांत कुठेही सुविधा उपलब्ध करून दिलेली नाही.

पार्किंगच्या जागांना विळखा
विकास राऊत, औरंगाबाद
शहरात वाहनांची संख्या वाढत आहे. वाहन पार्क करण्यासाठी मनपाने १० वर्षांत कुठेही सुविधा उपलब्ध करून दिलेली नाही. परिणामी पार्किंग अभावी शहरवासीयांचे हाल होत असतानाच २००२ पर्यंतच्या विकास आराखड्यात पार्किंगसाठी आरक्षित असलेल्या जागेवरील आरक्षण उठवून त्या जागा बिल्डरांच्या घशात घालण्याच्या हालचाली पालिका दरबारी सुरू आहेत. तसे झाले तर भविष्यात शहरात पार्किंगचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे.
मनपा हद्दीतील विकास आराखड्यानुसार शहरातील वाढत्या वाहनसंख्येच्या अनुषंगाने आरक्षित केलेल्या पार्किंगच्या जागा धोक्यात आल्या आहेत. त्या जागांवरील आरक्षण उठविण्यासाठी मागील १० वर्षांपासून अनेकदा प्रयत्न झाले. २००७ पर्यंत अनेक जागांचे आरक्षण उठवून त्या बिल्डरांना देण्यात आल्या. सध्या काही जागांवर अतिक्रमणे झाली आहेत, तर काही ठिकाणी हक्कसोड प्रमाणपत्रांच्या आधारे दुसऱ्या ठिकाणच्या जागांचा मार्ग मोकळा करून दिला आहे.
पालिकेने भूसंपादन करण्याचा आजवर विचार केलेला नाही. टीडीआर, एफएसएससारखा मोबदला देण्यासाठीही मनपा पुढे आलेली नाही. त्यामुळे जागा असतानाही शहरात पार्किंगचा प्रश्न निर्माण झाला आहे.
शहरात सध्या ६ लाख वाहने आहेत. पैठणगेट, सादिया मार्केट, नागेश्वरवाडी वगळता शहरात कुठेही पे अॅण्ड पार्कची सुविधा मनपाने दिलेली नाही. गुलमंडी, औरंगपुरा भाजीमंडई, नागेश्वरवाडी नाला, बीबी का मकबऱ्याजवळ, पाणचक्की, क्रांतीचौक, देवगिरी कॉलेजजवळील जागांवर पार्किंगचे आरक्षण आलेले आहे.
वाढीव शहर हद्दीनुसार इटखेडा गट नं. ४०, ४१ मध्ये पार्किंगचे आरक्षण आले आहे. सातारा, पडेगाव, गारखेड्यात २००२ च्या विकास आराखड्यानुसार पार्किंगसाठी जागा आरक्षित केलेली आहे.