एकात्मतेवर सर्व धर्मगुरूंचे विचार मंथन

By Admin | Updated: December 8, 2015 00:06 IST2015-12-07T23:40:09+5:302015-12-08T00:06:31+5:30

बीड : देशपातळीवर असहिष्णूतेचा मुद्दा गाजत असताना सर्व धर्मांच्या धर्मगुरूंना एकत्रित करून देशाच्या अखंडता आणि ऐक्यावर एकत्रित मंथन करण्यासाठी

Chanting of thoughts on all religions | एकात्मतेवर सर्व धर्मगुरूंचे विचार मंथन

एकात्मतेवर सर्व धर्मगुरूंचे विचार मंथन


बीड : देशपातळीवर असहिष्णूतेचा मुद्दा गाजत असताना सर्व धर्मांच्या धर्मगुरूंना एकत्रित करून देशाच्या अखंडता आणि ऐक्यावर एकत्रित मंथन करण्यासाठी बीडमध्ये १० डिसेंबररोजी राष्ट्रीय एकात्मता परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. जमियतुल उलेमा-ए-हिंद संघटनेच्या पुढाकारातून हे विचारमंथन घडणार आहे. मराठवाड्यातून एक लाखापेक्षा अधिक लोक या परिषदेला हजेरी लावणार असून इन्सानियत को जिंदा रखने के लिए मंचपर चर्चा होगी, असे संयोजन समितीचे सदस्य आणि माजी उपनगराध्यक्ष फारूक पटेल यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
येथील बार्शी रोडवरील शासकीय दूध डेअरीच्या बाजुला ३० एकराच्या परिसरात परिषद होणार असून सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत विविध धर्मगुरूंचे मार्गदर्शन आणि चर्चा होणार आहे.
संघटनेचे अध्यक्ष हजरत मौलाना सय्यद अर्शद मदनी,हजरत मौलाना गुलाम मुहम्मद वस्तानवी, स्वामी लक्ष्मी शंकराचार्य, भंतोजी ज्ञानज्योती ताडोबा अभयराज्य, गुलजार अहमद आजमी, सिने दिग्दर्शक महेश भट्ट, माजी न्यायमुर्ती बी.जी. कोळसेपाटील, श्रीमंत कोकाटे, बिषप प्रदीप कांबळी, सुरजितसिंग खंगर, ह.भ.प. महादेव महाराज, डॉ.नामदेवशास्त्री महाराज, हजरत मौलाना नुरूल हक, यांची उपस्थिती राहणार आहे. या परिषदेच्या अध्यक्षस्थानी मौलाना मस्तकीम अहसन आजमी हे असतील.
परिषदेच्या यशस्वीतेसाठी मौलाना मोहम्मद जाकेर सिद्दीकी, मौलाना अब्दुल बाकी, अ‍ॅड. शेख शफीक, माजी न. प. उपाध्यक्ष मोईन मास्टर, न. प. उपाध्यक्ष हाजी नसीम इनामदार, शेख शफीक हाश्मी, शरद चव्हाण, बबन वडमारे, अशोक वाघमारे, संतोष जाधव, विनोद मुळूक आदी परिश्रम घेत आहेत.
देशाच्या एकात्मतेसंदर्भात ही परिषद होत असल्याचे सांगत पटेल म्हणाले, राष्ट्रीय एकात्मतेला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न या मंचावरून करण्यात येणार आहे. देशात विविध धर्माचा आदर करणे, त्यांच्या संस्कृतीचा आदर करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. देशात सध्या जातीयवादाचे वातावरण निर्माण होत आहे. काही लोक राजकीय फायदा उठविण्यासाठी जाती-जातीमध्ये तेढ निर्माण करताना दिसत आहेत. अशावेळी देशाची अखंडता आणि एकात्मतेला धोका निर्माण होऊ लागल्यामुळे सर्वांनी यासाठी एकत्रित येणे, ही काळाची गरज असल्याचेही पटेल म्हणाले. (प्रतिनिधी)

Web Title: Chanting of thoughts on all religions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.