कुलगुरूंचा वाढला ताण

By Admin | Updated: January 23, 2015 00:58 IST2015-01-23T00:49:32+5:302015-01-23T00:58:10+5:30

औरंगाबाद : विद्यापीठात मागील १५ दिवसांपासून कुलसचिव व परीक्षा नियंत्रकांच्या नेमणुकांवरून गोंधळाचे वातावरण आहे. संघटनांच्या बेकायदेशीर हस्तक्षेपामुळे

Chancellor increased tension | कुलगुरूंचा वाढला ताण

कुलगुरूंचा वाढला ताण


औरंगाबाद : विद्यापीठात मागील १५ दिवसांपासून कुलसचिव व परीक्षा नियंत्रकांच्या नेमणुकांवरून गोंधळाचे वातावरण आहे. संघटनांच्या बेकायदेशीर हस्तक्षेपामुळे कुलगुरूंनामानसिक त्रासाला सामोरे जावे लागले. हे नसे थोडके म्हणून की काय, व्यवस्थापन परिषदेचे राज्यपाल नियुक्त सदस्य उल्हास उढाण यांना अपात्र ठरवून त्यांच्या जागेवर नेमणूक करण्यासाठी पात्र तीन जणांची नावे पाठवावीत, या आशयाचे पत्र राज्यपाल कार्यालयाकडून कुलगुरूंना प्राप्त झाले आहे.
व्यवस्थापन परिषदेवर यापूर्वी ‘वोखार्ड’ चे वरिष्ठ अधिकारी डॉ. महाराज किशन साहिब हे राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून कार्यरत होते. दैनंदिन कामकाजामुळे अलीकडे त्यांना व्यवस्थापन परिषदेचे काम करणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांनी स्वत:हून कुलगुरूंकडे राजीनामा दिला होता. त्यानंतर राज्यपाल कार्यालयाने उल्हास उढाण यांची आॅगस्ट महिन्यात व्यवस्थापन परिषदेवर नियुक्ती केली. दोन महिन्यांनंतर उढाण यांच्या नियुक्तीस अधिसभा सदस्य गजानन सानप यांनी आक्षेप घेतला होता.
सानप यांच्या आक्षेपाची दखल घेऊन राज्यपाल कार्यालयाने २९ डिसेंबर रोजीच्या पत्रानुसार उल्हास उढाण यांना राज्यपालांचे प्रतिनिधी म्हणून व्यवस्थापन परिषदेवर अपात्र ठरविले आहे. ते व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यत्वाचे निकष पूर्ण करू शकत नाहीत, असे पत्रात नमूद करण्यात आले असून, कुलगुरूंनी उल्हास उढाण यांच्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी तीन जणांची नावे राज्यपाल कार्यालयाकडे पाठविण्याचे सूचित करण्यात आलेले आहे.
राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने १४ सप्टेंबर २००९ च्या अध्यादेशानुसार व्यवस्थापन परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्यांसाठी पात्रतेचे निकष ठरविले आहेत. त्या निकषानुसारच तिन्ही नावे पाठविण्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, राज्यपाल कार्यालयाने २९ डिसेंबर रोजी हे पत्र कुलगुरू कार्यालयास पाठविले आहे. त्यानंतर व्यवस्थापन परिषदेच्या तीन बैठका विद्यापीठाने घेतल्या आहेत. त्या तिन्ही बैठकांना कुलगुरूंनी रीतसर आपणास निमंत्रित केल्याचे उल्हास उढाण यांचे म्हणणे आहे. आपणास आतापर्यंत अपात्रतेबद्दल कुलगुरूंनी कळविले नसल्याचेही ते म्हणतात. तर दुसरीकडे सत्ताधारी भाजप गोटातून व्यवस्थापन परिषदेवर जाण्यासाठी अनेक जण बाशिंग बांधून असल्याची माहितीही समोर आली आहे. १
कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्याकडे राज्यपाल कार्यालयाच्या पत्राबद्दल खातरजमा करण्यासाठी संपर्क साधला असता ते उपलब्ध होऊ शकले नाही.

Web Title: Chancellor increased tension

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.