मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया ठप्प
By Admin | Updated: July 6, 2014 00:34 IST2014-07-06T00:15:46+5:302014-07-06T00:34:20+5:30
औरंगाबाद : आरोग्य सेवेतील डॉक्टर संपावर गेल्याने ग्रामीण भागातील रुग्णसेवा विस्कळीत झालेली आहे.

मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया ठप्प
औरंगाबाद : आरोग्य सेवेतील डॉक्टर संपावर गेल्याने ग्रामीण भागातील रुग्णसेवा विस्कळीत झालेली असतानाच औरंगाबादेतील आमखास मैदान येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात आयोजित करण्यात येणारे मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर १५ जुलैपर्यंत रद्द करण्यात आले आहे.
वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या संपामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण आणि उपजिल्हा रुग्णालये ओस पडली आहेत. ग्रामीण भागातील आरोग्य सेवा कोलमडलेली असतानाच आमखास मैदान येथील जिल्हा नेत्र रुग्णालयातील मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया, बाह्यरुग्ण विभाग बंद पडला आहे. विशेष म्हणजे ३० खाटांच्या या रुग्णालयात गरीब आणि गरजू रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येतात. ग्रामीण भागात जाऊन मोतीबिंदू झालेल्या रुग्णांचा शोध घेऊन त्यांना रुग्णालयात आणले जाते. तेथे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करणे, त्यांची राहण्याची, जेवणाची व्यवस्थाही मोफत करण्यात येते. त्यामुळे या रुग्णालयात मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या जिल्ह्यात सर्वाधिक असते. नेत्र शल्यचिकित्सक डॉ. सुनीता गोलाईत यांनी संपाच्या पहिल्या दिवशी २५ रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया केल्या. तसेच बाह्यरुग्ण विभागात रुग्णांची तपासणीही सुरू ठेवली होती. ही बाब मॅग्मो संघटनेच्या डॉक्टरांना समजताच त्यांनी रुग्ण तपासणी बंद पाडली होती. त्यामुळे चार दिवसांपासून या रुग्णालयातील ओपीडीही बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाला घ्यावा लागला आहे. याविषयी डॉ. गोलाईत यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, संपामुळे डॉक्टरच उपलब्ध नसल्याने मोतीबिंदूसह जिल्ह्यातील सर्व शस्त्रक्रिया बंद ठेवण्यात आल्या आहेत. याशिवाय कुटुंब नियोजन शस्त्रक्रियाही ठप्प असल्याचे त्यांनी सांगितले. मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर आम्ही १५ जुलैपर्यंत बंद ठेवले आहे. यादरम्यान संप मिटल्यास बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्यात येईल.