अवैध नळजोडणीचे प्रकरण हायकोर्टात
By Admin | Updated: July 17, 2017 00:34 IST2017-07-17T00:17:19+5:302017-07-17T00:34:10+5:30
हिंगोली : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पालिकेच्या मुख्य जलवाहिनीवरून महामार्गावरील धाबे, बीअर शॉपी आणि शेतात अनधिकृत जोडणी केलेल्या १५ जणांना प्रत्येकी १५ लाख ४० हजार ६०२ रुपयांप्रमाणे कर आकारला होता.

अवैध नळजोडणीचे प्रकरण हायकोर्टात
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पालिकेच्या मुख्य जलवाहिनीवरून महामार्गावरील धाबे, बीअर शॉपी आणि शेतात अनधिकृत जोडणी केलेल्या १५ जणांना प्रत्येकी १५ लाख ४० हजार ६०२ रुपयांप्रमाणे कर आकारला होता. पालिकेतर्फे दंड भरण्यासंदर्भात अनेकदा नोटीसाही बजावल्या तरीही कोणीही दंड भरला नाही. आता हे प्रकरण हायकोर्टात गेल्याने दोषीवर कारवाई होणार हे मात्र निश्चित.
शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या मुख्य जलवाहिनीची १२ एप्रिल रोजी पालिकेने बारकाईने पाहणी केली असता मुख्य वाहिनीवर १५ अवैध नळ जोडण्या आढळून आल्या होत्या. विशेष म्हणजे आ. तान्हाजी मुटकुळे यांनी विधानसभेत हा अनधिकृत नळ जोडणीचा तारांकित प्रश्न मांडला होता. त्यामुळे पालिका जोमाने कामाला लागली होती. मुख्य वाहिनीवर संतुक पिंप्री शिवारात तीन अनधिकृत नळ जोडण्या, तर बापूजी ढाबा येथे दोन नळ जोडण्या, हॉस्टेल साई छाया, साई हॉटेल भोजनालय, श्री गणेश बॉईज हॉस्टेल, मे. खुराणा जिनिंग अँड प्रेसिंग फॅक्ट्री, नंदा गणेशलाल बियाणी, कमल बाबल्या चव्हाण, माऊली टी हाऊस, तंदुरी नाईट हॉटेल, वैभव बार १, वैभव बार २, हॉटेल साई गार्डन अॅड रेस्टॉरेंट अशा एकूण पंधरा ठिकाणी अनधिकृत नळ जोडण्या दिसून आल्या होत्या. या प्रत्येक नळ जोडणीला पालिकेतर्फे १५ लाख ४० हजार ४०२ रुपये दंड आकारला होता. या दंडाची रक्कम २ कोटी ४० लाख ७३ हजार ६३२ रुपयांवर जाऊन पोहोचली आहे. हा दंड विहित मुदतीत पालिकेत भरला नाही तर संबंधितांवर गुन्हे दाखल करून जागेला सील केले जाणार होते. परंतु चार महिने उलटूनही दंड भरलेला नाही. आता तर हे प्रकरणच हायकोर्टात गेल्याने दोषींवर होणाऱ्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.