---
औरंगाबाद : अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील त्रुटींमुळे शहरात ११६ महाविद्यालयांना विद्यार्थी तर विद्यार्थ्यांना महाविद्यालयांत प्रवेश मिळत नसल्याने दोघांचे नुकसान होत आहे. तर ग्रामीणमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवेश होत आहे. त्यामुळे औरंगाबाद शहरातील अकरावीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया बंद करुन क्षमतेपक्षा अधिक प्रवेश करणाऱ्या कनिष्ठ महाविद्यालयांवर कारवाई करा, अशी मागणी आ. सतीश चव्हाण यांनी विधान परिषदेत केली.
महानगरपालिका क्षेत्रातील अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत अनेक त्रुटी असून, २०१७-१८ मध्ये ५० टक्के, १८-१९ मध्ये ५१ टक्के, १९-२० मध्ये ६० टक्के तर २०-२१ मध्ये ४५ टक्के जागा रिक्त राहिल्या. परिणामी, शहरातील प्रवेश पूर्ण क्षमतेने न झाल्याने शिक्षकदेखील अतिरिक्त होत असल्याचे आ. चव्हाण यांनी सभागृहात सांगितले. औरंगाबाद शहरातील अकरावीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया रद्द करावी, ज्या महाविद्यालयांनी क्षमतेपेक्षा जास्त प्रवेश दिले त्यांच्यावर कारवाईची मागणी त्यांनी केली. या चर्चेत आ. अंबादास दानवे, आ. विक्रम काळे यांनीही सहभाग नोंदवला.
----
कोरोनाची परिस्थिती पाहून घेऊ निर्णय
--
अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया रद्द करण्यासाठी अभ्यास करून तसेच आगामी काळातील कोरोनाची परिस्थिती पाहून योग्य निर्णय घेतला जाईल. असे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी विधान परिषदेत आ. चव्हाण यांच्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
--