...तर केबल कनेक्शन बंद होणार
By Admin | Updated: September 27, 2014 00:26 IST2014-09-27T00:26:04+5:302014-09-27T00:26:04+5:30
हिंगोली : जिल्ह्यात ३१ डिसेंबरपर्यंत सेटटॉप बॉक्स न बसविल्यास ग्राहकांना केबल कनेक्शनवर सेवा मिळणार नाही.

...तर केबल कनेक्शन बंद होणार
हिंगोली : जिल्ह्यात ३१ डिसेंबरपर्यंत सेटटॉप बॉक्स न बसविल्यास ग्राहकांना केबल कनेक्शनवर सेवा मिळणार नाही. डिजिटल सेवेची सुरूवात झाल्यानंतर सेट टॉप बॉक्स अनिवार्य करण्यात आला आहे. शिवाय महसुलाच्या दृष्टीनेही ही बाब फायदेशीर असल्याने भरारी पथकांमार्फत तपासणी केली जाणार आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण फुलारी यांनी सांगितले.
हिंगोली जिल्ह्यात एकूण २७ केबलचालक आहेत. त्यांच्याकडे १४ हजार ३६६ केबल जोडण्या आहेत. हिंगोली शहरात १५ केबल नेटवर्क होते. त्यापैकी दोन केबल नेटवर्क चालकांचे प्रत्येकी ४ याप्रमाणे ८ केबल इनपुटर्स झालेले आहेत. त्यामुळे सध्या जिल्ह्याची केबल नेटवर्कची संख्या २७ झाली आहे.
जिल्ह्यात १६४0९ डीटीएच जोडण्या आहेत. यातून १८.५0 लाखांचा महसूल शासनाला आतापर्यंत प्राप्त झाला आहे. तर केबलद्वारे १५.३७ लाखांचा महसूल मिळाला आहे. महसूल विभागाने आता केबलला सेट टॉप बॉक्स अनिवार्य केला असून करमणूक शुल्क भरण्याची जबाबदारी मल्टी सिस्टम आॅपरेटरवर निश्चित केली आहे. जिल्ह्यातील केबल धारकांनी आता सेट टॉप बॉक्स बसविण्याचे काम पूर्ण करायचे आहे. त्यातच ग्राहकांनी याकडे लक्ष वेधणे गरजेचे आहे. तपासणीत एसटीबी न आढळल्यास कारवाईही होणार आहे. केबलचालकांनाही दंड होऊ शकतो. (प्रतिनिधी)