शालेय साहित्य खरेदी; पालकांची लगबग सुरू
By Admin | Updated: June 10, 2014 00:33 IST2014-06-10T00:29:49+5:302014-06-10T00:33:54+5:30
बीड: सध्या पुस्तकांच्या दुकानात पालकांसह चिमुकल्या विद्यार्थ्यांची गर्दी पहावयास मिळत आहे. शालेय साहित्य खरेदी करण्यासाठी पालकांची लगबग सुरू आहे.
शालेय साहित्य खरेदी; पालकांची लगबग सुरू
बीड: सध्या पुस्तकांच्या दुकानात पालकांसह चिमुकल्या विद्यार्थ्यांची गर्दी पहावयास मिळत आहे. शालेय साहित्य खरेदी करण्यासाठी पालकांची लगबग सुरू आहे. गतवर्षीपेक्षा वीस टक्क्यांनी पुस्तकांच्या किमती वाढल्या असल्याने आपल्या पाल्यांसाठी शालेय साहित्य खरेदी करताना पालकांना महागाईची झळ बसत आहे. असे असले तरी पुस्तकांच्या दुकानांत पालकांनी गर्दी केली असल्याचे सोमवारी पहावयास मिळाले.
उन्हाळ्याच्या सुट्या संपल्या, आता शाळेची तयारी सुरू झाली असून सोमवारी बीड शहरातील पुस्तकांची दुकाने हाऊसफुल होत असल्याचे पहावयास मिळत आहे. १६ जूनपासून जिल्ह्यातील शाळा सुरू होत आहेत. आतापासूनच बच्चेकंपनी वर्षभर लागणाऱ्या शालेय साहित्याची जमवाजमव करण्याच्या तयारीला लागले आहेत. यामध्ये गणवेश, वॉटरबॅग, शॅग, वह्या पुस्तके, पेन खरेदीसाठी पालकांबरोबर बाजारात गर्दी करत आहेत.
मुलांच्या हट्टामुळे पालकांचे
बजेट बिघडले
एका विशिष्ट कंपनीचीच वही अथवा स्कूलबॅग घेण्यासाठी मुलं हट्ट करत असल्याने पालकांना मुलं म्हणतील तीच स्कूलबॅग घेवून देणे भाग पडत आहे. यातच गतवर्षीच्या तुलनेत वह्या पुस्तकांमध्ये वीस टक्क्यांची वाढ झालेली असल्याने पालकांना मुलांच्या हट्टामुळे ते म्हणतील, तेच घ्यावे लागत असल्याने पालकांचे महिन्याचे अर्थिक बजेट बिघडत असल्याचे काही पालकांनी सांगितले.
चायनाच्या स्कूलबॅगला मागणी
वेगवेगळ्या आकाराच्या व आकर्षक दिसणाऱ्या स्कूलबॅग बाजारात दाखल झाल्या आहेत. यामध्ये चायना स्कूलबॅगला मोठ्या प्रमाणात मागणी असल्याचे शालेय पुस्तके व साहित्याचे विक्रेते अतुल दहिवाळ यांनी सांगितले. यामध्ये २०० पासून ७०० रुपयांपर्यंत चायना स्कूल बॅग उपलब्ध आहे. इंडियन स्कूल बॅगच्या किमती जास्त असल्याने पालक चायना स्कूल बॅगलाच पसंती देत असल्याचे दुकानदारांनी सांगितले.
तिसरी व चौथीच्या
अभ्यासक्रमात बदल
इयत्ता तिसरी व चौथीचा अभ्यासक्रम बदलला आहे. यामुळे विद्यार्थी नवीन अभ्यासक्रम अभ्यासणार असल्याचे पहावयास मिळत आहे. यामुळे मुलांमध्ये उत्साह असल्याचे सोमवारी शालेय खरेदीच्या दुकानात पहावयास मिळाले. (प्रतिनिधी)
पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके
जिल्हा परिषद शाळेतील पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शासन मोफत पाठ्यपुस्तके देत असल्याने गरीब विद्यार्थ्यांना याचा चांगला फायदा होतो. यावर्षीदेखील ८ वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके देणार असल्याने बाजारात जिल्हा परिषद शाळेतील व ग्रामीण भागातील विद्यार्थी पुस्तक खरेदीला येत नाहीत. मात्र इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना बाजारातूनच पुस्तक खरेदी करावे लागत आहे. पुस्तकांबरोबरच स्कूल बॅग, वॉटरबॅग, कंपास विद्यार्थी व पालक खरेदी करीत आहेत.