बस झाली वाकडी जीवघेणी बससेवा!ं
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2016 23:43 IST2016-07-06T23:32:19+5:302016-07-06T23:43:43+5:30
जालना : विद्यार्थिनींच्या सेवेसाठी धावणारी मानव विकास योजनेंतर्गतची बस आज त्याच विद्यार्थिनींच्या जिवावर उठली आहे.

बस झाली वाकडी जीवघेणी बससेवा!ं
जालना : विद्यार्थिनींच्या सेवेसाठी धावणारी मानव विकास योजनेंतर्गतची बस आज त्याच विद्यार्थिनींच्या जिवावर उठली आहे. अपुऱ्या बसेसमुळे ५६ प्रवाशांची क्षमता असलेल्या बसमध्ये तब्बल १०० विद्यार्थिनी बसविल्या जात आहेत. त्यामुळे या विद्यार्थिनींना जीव धोक्यात घालून ज्ञानार्जनासाठी शाळा गाठण्याची वेळ येत असल्याचे बुधवारी उघडकीस आले आहे.
ग्रामीण भागातील मुली शिक्षणापासून वंचित राहू नयेत, त्यांची शाळा गाठण्यासाठी पायपीट होऊ नये, वेळेवर शाळेत जाता यावे, यासारखे विविध उद्देश डोळ्यांसमोर ठेऊन चार वर्षांपूर्वी मानव विकास योजना सुरू करण्यात आली. या योजनेंतर्गत प्रत्येक तहसीलच्या अधिकारात बसेस देण्यात आल्या. विद्यार्थिनींची संख्या गटशिणाधिकारी यांनी देणे बंधनकारक आहे.
शाळा आणि विद्यार्थिनींची संख्याच महामंडळाला व्यवस्थित दिली नाही, असा आरोप पालकांनी केला आहे. याबाबत गटशिक्षणाधिकारी विपूल भागवत यांना वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो होऊ शकला नाही. (प्रतिनिधी)
जालना-रांजणी मार्गावर मानव विकासची बस (एमएच ०६ एस ८६६६) धावते. या मार्गावर वझर, सेलगव्हाण, विरेगाव, धानोरा, येणोरा, कवठा, कवठा तांडा या गावांचा संपर्क येतो. येथील काही विद्यार्थिनी शिक्षणासाठी जालना तर काही इतर ठिकाणच्या शाळेत जातात. परंतु बस एकच आणि विद्यार्थिनींची संख्या १९८ एवढी. मग एका बसमध्ये एवढ्या विद्यार्थिनी बसणार कशा? असा सवाल उपस्थित होत आहे. जास्त संख्या झाल्याने बस चक्क वाकडी झाली होती.
जादा बस सुरू करण्याकडे दुर्लक्ष होत असले तरी सुरू असलेल्या एका बसच्या जरी फेऱ्या वाढविल्या तर या विद्यार्थिनी सुरक्षितरित्या शाळेत पोहचू शकतात. परंतु याकडे गटशिक्षणाधिकारी दुर्लक्ष करीत असून एखादा गैरप्रकार घडल्यास याला सर्वस्वी बीईओंना जबाबदार धरण्यात येईल, असा इशारा येथील पालकांनी दिला आहे.