जळकोटकर पाण्यासाठी रानोमाळ !
By Admin | Updated: February 20, 2015 00:08 IST2015-02-19T23:56:34+5:302015-02-20T00:08:18+5:30
एम़जी़मोमीन ,जळकोट तालुक्यात यंदा अत्यल्प पर्जन्यमान झाल्याने फेब्रुवारीतच पाणीटंचाईच्या झळा बसत आहेत़

जळकोटकर पाण्यासाठी रानोमाळ !
एम़जी़मोमीन ,जळकोट
तालुक्यात यंदा अत्यल्प पर्जन्यमान झाल्याने फेब्रुवारीतच पाणीटंचाईच्या झळा बसत आहेत़ तालुक्यातील १२ साठवण व १०० इतर तलाव कोरडे पडले असून टंचाईवर मात करण्यासाठी दोन गावांत ५ टँकर सुरु करण्यात आले आहेत़ सात गावांत बोअर, विहिर अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे़
तालुक्याचे वार्षिक पर्जन्यमान १२०० मि़मी़असून यावर्षी केवळ ३०० ते ३५० मि़मी़ पाऊस झाला़ परिणामी, पाणीपातळी दिवसेंदिवस खालावत आहे़ जलस्त्रोत कोरडे पडत असल्याने नागरिकांना पाण्यासाठी तासन्तास पाणवठ्यावर उन्हात थांबावे लागत आहे़ तालुक्यातील करजी, सोनवळा, मेवापूर, जळकोट या गावांना बोअर, विहिर अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे़ तर जळकोट शहराला ४ टँकरने आणि उमरदरास १ ट्रॅक्टरने पाणीपुरवठा चालू आहे़ एकुर्गा, बोरगाव, शिवाजी नगर आदी गावांनी टँकरची मागणी केली आहे़ तालुक्यातील १२ साठवण तलावांनी तळ गाठला आहे़ यातील बहुतांशी तलावावर पाणीपुरवठा योजना आहेत़ परंतु, आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येईल? त्यामुळे माळहिप्परगा तलाव वगळता उर्वरित तलाव कोरडेठाक पडल्याचे लघु पाटबंधारे विभागाने केलेल्या सर्वेक्षणातून दिसून येत आहे़
जळकोट तालुक्यातील माळहिप्परगा येथील तलाव वगळता ढोरसांगवी, धोंडवाडी साठवण तलाव कोरडे पडले आहेत़ हळदवाढवणा, जंगमवाडी, सोनवळा, डोंगरगाव व गुत्ती १ या साठवण तलावांची पाणी पातळी जोत्याखाली आहे़ माळहिप्परगा तलावाचे काम दोन वर्षांपूर्वी झाल्यामुळे व इतर तलावांच्या तुलनेत माळहिप्परगा तलावातील पाणी उपसा कमी असल्यामुळे सध्या ७५ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे़ रावणकोळा साठवण तलावात २६ टक्के, केकतसिंदगी तलावात १२ टक्के, गुत्ती तलावात ०़७० टक्के, चेरा तलावात ०़३५ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे़