गुंठेवारी भागात पाण्याची बोंब
By Admin | Updated: September 3, 2014 00:20 IST2014-09-03T00:19:23+5:302014-09-03T00:20:13+5:30
औरंगाबाद : आज अनेक भागांत टँकर पोहोचले नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.

गुंठेवारी भागात पाण्याची बोंब
औरंगाबाद : गुंठेवारी वसाहतींमध्ये १ सप्टेंबरपासून औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीने नेमलेल्या कंत्राटदाराने पाणीपुरवठा सुरू केला असून आज अनेक भागांत टँकर पोहोचले नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.
वसाहतींचे पत्ते, मार्ग आणि टँकर पाठविण्याच्या वेळा माहिती नसल्यामुळे कंपनीने नेमलेले टँकर वेळेत गेले नाहीत. गौरी गणपतींचे आज आगमन झाले. टँकरने पाणीपुरवठा न झाल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात धावपळ करावी लागली. पालिकेच्या टँकरचे काय झाले, गुंठेवारी वसाहतींसाठी स्वतंत्र सेल सुरू केला आहे काय, याबाबत पालिकेतून आणि कंपनीकडून कुणीही माहिती देण्यास तयार नाही. १ सप्टेंबरपासून टँकरने पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीकडे दिली आहे.
गुंठेवारी वसाहतींत टँकरने पाणीपुरवठा करण्याचे धोरण कंपनीने अजून तरी ठरविलेले नाही. टँकर महागणार काय, कंपनी वेळेत पाणीपुरवठा करणार की नाही, यासारखे अनेक प्रश्न नागरिकांना भेडसावत असून त्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे.
अमूल लॉरी सर्व्हिसेसचे टँकर मनपाकडे होते. ते बंद झाले आहेत. रोज ३० वसाहतींना ३ एमएलडी म्हणजेच ३० लाख लिटर पाणीपुरवठा टँकरने होतो. ३० वॉर्डांतील सुमारे ५० हजार नागरिक टँकरचे पाणी पितात. एक टँकर ८ फेऱ्या मारीत असल्याचा यांत्रिकी विभागाचा दावा आहे. ११ टँकर १० हजार लिटरचे आहेत. सध्या ४६ टँकरने पाणीपुरवठा होतो आहे. शहरातील सुमारे ५० हजार नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा करते. आता खाजगीकरणामुळे अडचणीची शक्यता आहे.
फेऱ्यांचे चक्र असे
1मनपा ५ हजार लिटरच्या ४७ टँकरने पाणीपुरवठा करीत होती. उन्हाळ्यात ६० पर्यंत टँकर होते. त्या टँकरच्या अंदाजे ४३० फेऱ्या होत असत. त्यातून २२ लाख ४० हजार लिटर पाणीपुरवठा केला जायचा. १० हजार लिटरचे ७ टँकर मनपाकडे आहेत. त्यांच्या ८८ फेऱ्या होतात. ९ लाख लिटर पाणी त्या टँकरमधून पुरविले जाते. एकूण ३१ लाख २० हजार लिटर पाणी टँकरने दिले जाते.
या वसाहती टँकरवर
2प्रभाग अ व ड मधील पडेगाव, मिटमिटा, पेठेनगर, खुशबू कॉलनी, पहाडसिंगपुरा, हर्सूल, हिमायतबाग या भागांत टँकरने पाणीपुरवठा होतो. प्रभाग ब व क मधील मिसारवाडी, जाधववाडी, म्हसोबानगर, भगतसिंगनगर, केशरदीप, छत्रपतीनगर, माऊलीनगरमध्ये, तर प्रभाग ई व फ मधील जयभवानीनगर, गुरुदत्तनगर, रामनगर, रेणुकानगर, आनंदनगर, अबरार कॉलनी, महूनगर, गणेशनगर, हनुमाननगर, संतोषी मातानगर, गारखेडा परिसरात टँकरने पाणीपुरवठा होतो.