मोठ्या प्रमाणात मतविभागणी
By Admin | Updated: October 22, 2014 01:17 IST2014-10-22T00:46:32+5:302014-10-22T01:17:05+5:30
जालना : विधानसभा मतदारसंघात अपेक्षेप्रमाणेच चौरंगी लढत झाली. शिवसेना, काँग्रेस, भाजपा आणि बसपा या उमेदवारांमध्ये शेवटच्या फेरीपर्यंत मताधिक्यांमध्ये होणाऱ्या

मोठ्या प्रमाणात मतविभागणी
जालना : विधानसभा मतदारसंघात अपेक्षेप्रमाणेच चौरंगी लढत झाली. शिवसेना, काँग्रेस, भाजपा आणि बसपा या उमेदवारांमध्ये शेवटच्या फेरीपर्यंत मताधिक्यांमध्ये होणाऱ्या चढ-उतारामुळे मतदारांनी उमेदवारांसह त्यांच्या समर्थकांची उत्सुकता अखेरपर्यंत कायम ठेवली. या निवडणुकीत शिवसेना उमेदवार अर्जुन खोतकर यांनी काँग्रेसचे उमेदवार कैलास गोरंट्याल यांचा केवळ २९६ मतांनी पराभव केला. या प्रमुख चार उमेदवारांशिवाय अन्य १३ उमेदवारांच्या अनामत रक्कमा जप्त झाल्या.
या मतदारसंघात सुरूवातीला काँग्रेस आणि शिवसेना या उमेदवारांमध्येच दुरंगी लढत होणार असे चित्र होते. परंतु प्रत्यक्षात युती फुटल्यामुळे भाजपातर्फे माजी आमदार अरविंद चव्हाण हेही रिंंगणात उतरले. तर बसपाच्या अब्दूल रशीद पहेलवान यांनीही अत्यंत चुरशीची लढत दिली. त्यामुळे गोरंट्याल आणि खोतकर या पारंपरिक उमेदवारांचे मतविभाजन होणारच, याची चर्चा पूर्वीपासूनच सुरू होती. परंतु या मतविभाजनाचा फटका कुणाला बसणार, हे शेवटपर्यंत कुणी स्पष्ट सांगू शकत नव्हते. परिणामी ग्रामीण आणि शहरी भागातील मतदारांचा कौल कुणाच्या बाजूने जाणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरले होते.
माळेगाव बु. या गावात चव्हाण यांनी १४४ तर खोतकर यांनी ११९ मते मिळविली. गोरंट्याल यांना ९२ मते मिळाली. वरखेडा सिंदखेड, पोखरी सिंदखेड, कुंभेफळ सिंदखेड या गावांमध्येही खोतकर यांनी मताधिक्य मिळविले. धावेडीने खोतकर यांना आणखी तारले. तेथे त्यांना ५७५ तर गोरंट्याल यांना २२७ मते मिळाली. रशीद यांना रामनगर २, रामनगर ५, ७, ८,९, ख्रिस्ती कॅम्प ५, ६, भीमनगर १,२, काजीपुरा १, कबाडी मोहल्ला, खडकपुरा १, शास्त्री मोहल्ला, कुंभारगल्ली, तट्टूपुरा, मोरंडी मोहल्ला, साळी गल्ली, सिंधी काळेगाव, राममूर्ती, मंजरेवाडी इत्यादी मतदान केंद्रांवर मताधिक्य मिळाल्याने काही फेऱ्यांमध्ये रशीद यांची लढत गोरंट्याल किंवा खोतकर यांच्याच सोबत झाली. मंठा रोड, एसआरपीएफ, मोदीखाना, औद्योगिक वसाहत,सराफा, नळगल्ली, लक्ष्मीनारायपुरा भागात गोरंट्याल यांना आघाडी मिळाली.(प्रतिनिधी)४
राष्ट्रवादी कॉँग्रेसचे खुशालसिंह ठाकूर व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रवि हरिभाऊ राऊत यांना काही केंद्रांवर भोपळाही फोडता आला नाही. माजी आमदार अरविंद चव्हाण यांना मंजरेवाडी केंद्रावर केवळ २ मते मिळाली. वखारी २ येथे खोतकर हे जवळपास वन-वे चालले. साळेगाव नेर, मानेगाव खालसा यासारख्या केंद्रांवर चव्हाण यांचे मताधिक्य राहिल, असा अंदाज होता. मात्र तो फोल ठरला. या ठिकाणी खोतकर आणि गोरंट्याल यांना चांगली मते मिळाली. सावरगाव हडप, सिंधीकाळेगाव सिरसवाडी, इंदेवाडी, आंतरवाला, सामनगाव, गोलापांगरी या केंद्रांवर खोतकर यांना सर्वाधिक मते पडली.