छतावर वीज बनवा आणि विका
By Admin | Updated: June 24, 2016 01:32 IST2016-06-24T00:38:52+5:302016-06-24T01:32:30+5:30
सुनील कच्छवे , औरंगाबाद सौरऊर्जेच्या माध्यमातून घराच्या छतावरच ऊर्जा निर्मिती प्रकल्प साकारण्याची योजना महावितरणने आणली आहे. तुम्ही निर्माण केलेली आणि वापरानंतर उरलेली

छतावर वीज बनवा आणि विका
सुनील कच्छवे , औरंगाबाद
सौरऊर्जेच्या माध्यमातून घराच्या छतावरच ऊर्जा निर्मिती प्रकल्प साकारण्याची योजना महावितरणने आणली आहे. तुम्ही निर्माण केलेली आणि वापरानंतर उरलेली वीज महावितरण विकत घेणार आहे. शहरात या योजनेस प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत शहरातील बारा जणांनी तसा प्रकल्प उभारून महावितरणकडे त्याची नोंदणी केली आहे. राज्यात सौरऊर्जा निर्मितीची परवानगी आतापर्यंत मोठ्या उद्योजकांनाच होती. मात्र आता निवासी, वाणिज्यिक, औद्योगिक वसाहती आणि हाऊसिंग सोसायट्यांना छतावर वीज निर्मिती करता येत आहे. महावितरणने त्याबाबत काही महिन्यांपूर्वीच नवीन नियमावली जारी केली आहे. त्यानुसार नागरिकांना त्यांच्या वापरानंतर वाचलेली वीज महावितरणला विकता येणार आहे. महावितरणच्या धोरणानुसार सिंगल फेस ग्राहक आठ किलोवॅट, थ्री फेज ग्राहक १५० किलोवॅट वीज निर्माण करूशकतो. मनपा हद्दीतील ग्राहक १५० किलोवॅट ते १ मेगावॅट वीज निर्माण करू शकतात. मनपा हद्दीबाहेरील ग्राहक ८० किलोवॅट ते १ मेगावॅट वीज निर्माण करू शकतात. न वापरलेली वीज नेटमीटरिंगद्वारे महावितरणला विकत देता येणार आहे.
याविषयी महावितरणचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी सांगितले की, महावितरणच्या या योजनेला शहरात प्रतिसाद मिळण्यास सुरुवात झाली आहे. याअंतर्गत आतापर्यंत शहरात सिंगल फेजच्या सात आणि थ्री फेजच्या पाच ग्राहकांनी महावितरणकडे नोंदणी केली असून, त्यांनी छतावर सौरऊर्जा निर्मिती सुरू केली आहे. यामध्ये चंद्रशेखर चौधरी, रामचंद्र रत्नपारखे, किशोर सोनवणे, राजीव मुंदडा, ऋषिकेश धर्माधिकारी, अरविंद ढोबले, गोपाल नावंदर तसेच राज आॅटो, विनोद तोतला, मिलिंद वाघ, गिरवारसिंग सुखमनी, केदार पानसे यांचा समावेश आहे.
विजेची देवाण- घेवाण नेटमीटरिंगद्वारे
सध्या शहरात बारा जणांकडून ऊर्जानिर्मिती होत आहे. परंतु तूर्तास त्यांच्याकडे निर्माण होणारी वीज ही त्यांचीच गरज भागविण्याइतकी आहे. त्यामुळे सध्या तरी त्यांच्याकडून महावितरणला वीज विकत मिळत नसल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या बारा ग्राहकांकडे महावितरणचे वीज कनेक्शन आहे. त्यालाच नेटमीटर बसविण्यात आलेले आहे. तसेच सौरऊर्जा प्रकल्पाचे कनेक्शनही जोडण्यात आलेले आहे. त्यामुळे संबंधित ग्राहकांना जेव्हा सौरऊर्जेपासूनची वीज मिळत नसेल तेव्हा महावितरणच्या पोलवरून वीज मिळते.