दीड हजार कुटुंबियांना भाऊबीज भेट
By Admin | Updated: November 14, 2015 00:52 IST2015-11-14T00:03:35+5:302015-11-14T00:52:35+5:30
बीड : आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना थेट आर्थिक मदत केल्यानंतर दिवाळी भाऊबीजेचे औचित्य साधून शिवसेना गोरगरीब कुटुंबियांसाठी पुन्हा एकदा धावून आली.

दीड हजार कुटुंबियांना भाऊबीज भेट
बीड : आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना थेट आर्थिक मदत केल्यानंतर दिवाळी भाऊबीजेचे औचित्य साधून शिवसेना गोरगरीब कुटुंबियांसाठी पुन्हा एकदा धावून आली. शुक्रवारी दीड हजार कुटुंबियांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून शिवसेनेने भाऊबीजेची अनोखी भेट दिली.
येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात झालेल्या कार्यक्रमास पर्यावरणमंत्री रामदास कदम यांची विशेष उपस्थिती होती. सेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख सुधीर मोरे, आ. संजय सिरसाट, अंबादास जानवे, सुधीर पाटील, राजू वैद्य, वैभव पाटील, जिल्हाप्रमुख अनिल जगताप, उपजिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांची यावेळी उपस्थिती होती.
दिवाळीसाठी आवश्यक असलेल्या पणत्या, साबणापासून ते तेलसाखरेपर्यंतच्या डझनभर वस्तूंचे वाटप दीड हजार जणांना करण्यात आले. एका लाभार्थ्यास साधारणपणे तीन हजार रूपयापर्यंतच्या वस्तू देण्यात आल्या. यावेळी मंत्री कदम यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देत शिवसेना पाठीशी असल्याचे सांगितले. ते म्हणाले, जिल्ह्याला आत्महत्येचा कलंक लागला आहे. तो धुवून काढण्यासाठी शिवसेना यापूर्वी देखील धावून आलेली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी वैयक्तिक पातळीवर मदतीसाठी लाखोंची रक्कम उभी केली. दुष्काळी परिस्थितीचा सामना धीटपणे करावा लागेल. आत्महत्या हा पर्याय नाही. शिवसेना सोबत असताना संकटांना घाबरता कशाला ? असा धीरही त्यांनी दिला. बीड व मराठवाड्यातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत करण्यासाठी यापुढे देखील प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. संकटात सापडलेल्या सोन्यासारख्या माणसांना शिवसेना वाऱ्यावर सोडणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी शेतकरी, कार्यकर्ते उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या घरात सेनेचा दीवा
बीडमधील शेतकऱ्यांच्या भेटीला अनेकजण हात हलवित आले आणि गेले. प्रत्यक्ष मदत घेऊन फक्त शिवसेना आली, अशा शब्दात त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला. शेतकऱ्यांच्या घरामध्ये दीवा पेटविण्याचे काम केवळ शिवसेनेने केलेले आहे, असे सांगायलाही ते विसरले नाहीत.
शिवसेनेची मदत सार्थकी
बीडमध्ये भीषण दुष्काळ आहे. मदतीसाठी निवडलेले लाभार्थी आर्थिक खाईत सापडलेले आहेत. अशा परिस्थितीत शिवसेनेने केलेली मदत सार्थकी ठरल्याचे प्रतिपादन संपर्कप्रमुख सुधीर मोरे यांनी केले.
इतरांना जाणीव नाही
जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी मार्गदर्शन करताना विरोधकांवर टीकेची झोड उठवली. बीडमध्ये मोठे नेते आहेत, मात्र त्यांच्यात दानत नाही. शिवसेना संवेदनशील असून, गोरगरीबांना आधार देण्याचे काम केले आहे. यापुढेही शिवसेनाच मदतीला येईल. (प्रतिनिधी)