ब्राह्मण समाज अन्य समाजांसमवेत संमेलने घेणार...
By Admin | Updated: February 8, 2016 00:19 IST2016-02-08T00:02:18+5:302016-02-08T00:19:20+5:30
लातूर : देशातील समाज वेगवेगळ्या जाती-जमातीत विखुरला गेला आहे. प्रत्येक जातीचे गट आहेत. त्यामुळे समाजा-समाजात दरी निर्माण होते. ही दरी दूर होण्याची गरज आहे.

ब्राह्मण समाज अन्य समाजांसमवेत संमेलने घेणार...
लातूर : देशातील समाज वेगवेगळ्या जाती-जमातीत विखुरला गेला आहे. प्रत्येक जातीचे गट आहेत. त्यामुळे समाजा-समाजात दरी निर्माण होते. ही दरी दूर होण्याची गरज आहे. त्यासाठी ब्राह्मण समाजाने पुढाकार घेण्याची गरज आहे, असे मत वेदशास्त्राचे अभ्यासक अतुल शास्त्री भगरे गुरुजी यांनी येथे रविवारी व्यक्त केले.
अखिल भारतीय ब्राह्मण महासंमेलन बेळंबे नगरात सुरू आहे. संमेलनातील ‘ब्राह्मण व ब्राह्मणेत्तर’ या विषयावरील परिसंवादात ते बोलत होते़ अध्यक्षस्थानी प़पू. दत्तात्रय महाराज रुईकर होते़ मंचावर संमेलन प्रमुख सुबोध बेळंबे, स्वागताध्यक्ष श्रीपाद कुलकर्णी, आ़ अमर राजूरकर, नांदेडचे नगरसेवक संजीव कोल्हे, परळीचे नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, पेशवा संघटनेचे अध्यक्ष दीपक रणनवरे आदी उपस्थित होते.
भगरे गुरुजी म्हणाले, काळ झपाट्याने बदलत आहे़ अशा स्थितीत देश प्रबळ बनला पाहिजे़ यासाठी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात केलेच पाहिजे़ त्याबरोबरच भारतीय संस्कृतीही तरुणांनी जपली पाहिजे़ ब्राह्मण समाज सुरुवातीपासूनच सर्व समाजाला सोबत घेऊन जात असून, सुरुवातीपासूनच तो सर्वांना मार्गदर्शक ठरला आहे़ ब्राह्मण समाजाच्या तरुणांनी केवळ शिक्षणच घेऊन थांबू नये, तर त्यांनी समाजकारणासोबतच राजकारणामध्येही आले पाहिजे, असेही ब्राह्मण तरुणांना यावेळी आवाहन केले़ माणसांनी आपापल्या गरजेसाठी विविध जाती-धर्माचे गट निर्माण केले आहेत़ त्यामुळे समाजा-समाजातील विचारांमध्ये दरी निर्माण करण्याचे काम काही लोक करीत असतात़ ती विचारांची दरी कमी करण्याची गरज असून, ब्राह्मण समाजातील तरुणांनी पुढे आले पाहिजे, असेही ते यावेळी म्हणाले़ या परिसंवादात बारामतीचे बाळासाहेब गावडे यांना ‘बाजीराव शौर्य पुरस्कारा’ने गौरविण्यात आले़ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय जेवरीकर, वैशाली गोस्वामी, संजय अयाचित यांनी केले़ (प्रतिनिधी)
समाजा-समाजात असलेली दरी कमी करण्यासाठी ब्राह्मण समाजाने यापूर्वीही पुढाकार घेतला आहे. आता वाढत असलेली दरी कमी करण्यासाठी ब्राह्मण समाज ब्राह्मण-धनगर समाज, ब्राह्मण-माळी समाज, ब्राह्मण-धोबी समाज अशी महासंमेलने घेणार आहे. जेणेकरून समाजा-समाजातील दरी कमी होईल, असेही भगरे गुरुजी म्हणाले.