बिंदुसरा तळाला
By Admin | Updated: November 3, 2014 00:40 IST2014-11-03T00:19:22+5:302014-11-03T00:40:39+5:30
सोमनाथ खताळ, बीड बीडकरांनो पाणी सांडताय.. थांबा ! ज्या धरणातून आपल्याला पाणी पुरवठा केला जातोय त्याची पाणी पातळी शुन्याच्या खाली गेली आहे. केवळ पंधरा दिवस पुरेल एवढेच पाणी आता बिंदुसरा धरणात

बिंदुसरा तळाला
सोमनाथ खताळ, बीड
बीडकरांनो पाणी सांडताय.. थांबा ! ज्या धरणातून आपल्याला पाणी पुरवठा केला जातोय त्याची पाणी पातळी शुन्याच्या खाली गेली आहे. केवळ पंधरा दिवस पुरेल एवढेच पाणी आता बिंदुसरा धरणात शिल्लक आहे. त्यामुळे बीड शहरावर पाणीटंचाईचे भीषण संकट उभे राहिले आहे. पालीकेच्या वतीने शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी माजलगाव धरणातून पाणी घेण्यात आले आहे.
बीड शहराला पाली येथील बिंदुसरा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र या धरणात सध्या केवळ ०.२९ दलघमी पाणी शिल्लक आहे. हे पाणी केवळ पंधरा दिवस पुरेल एवढेच असून पालीकेतील पाणी पुरवठा विभागाने हे पाणी संपण्याची तारीख १५ नोव्हेंबर जाहिर केली आहे. त्यामुळे यावर्षी बीड शहराला भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. गतवर्षी अपेक्षेप्रमाणे पाऊस झाल्यामुळे आणि बिंदुसरा धरणातील गाळ काढल्यामुळे धरणात भरपुर प्रमाणात पाणीसाठा होता. उन्हाळ्यात शेवटी शेवटी शहराला पाणीटंचाईचा सामना करावा लागला होता. मात्र यावर्षी हिवाळा सुरू होतो ना होतो तोच पाणीटंचाई जाणवू लागली आहे.
सध्या बीडशहराला चार ते पाच दिवसाला दीड तास पाणी सोडण्यात येत असल्याचे पाणी पुरवठा विभागाचे अभियंता एम.एस.वाघ यांनी सांगितले. प्रत्यक्षात अनेक भागात आजही पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याच्या तक्रारी ऐकावयास मिळत आहेत. पाणीसाठा पाहता बीडकरांनीच आता पाणी बचत करण्याची अवश्यकता असल्याचे मुख्याधिकारी श्रीकृष्ण भालसिंग यांनी सांगितले.
पाणी आरक्षीत ठेवण्याची मागणी
यावर्षी पाऊस कमी झाल्याने शेतकरी हवालदील झाला आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी माजलगाव धरणात विद्यूत पंप टाकले आहेत, ते शेतकरी शेतीपंपाद्वारे सर्रास पाणी उपसा करू लागले आहेत. असे झाले तर पाणी लवकर संपू शकते, त्यासाठी पाणी आरक्षित ठेवण्याची मागणी बीड, माजलगावातील नागरिकांमधून होत आहे.
बिंदुसरा धरण आटल्यामुळे माजलगावच्या धरणातून बीड शहराला पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. मात्र या धरणातही अल्प पाणीसाठा असल्याचे सांगण्यात आले.
४या धरणातून बीड शहरास माजलगाव शहर आणि तालुक्याला पाणीपुरवठा केला जात असल्याने हे पाणी संपण्याची भीतीही यावेळी अभियंता वाघ यांनी व्यक्त केली.
धरणातून पाणी उपसा
४पाणी टंचाईची परिस्थिती दिसून येत असतानाही माजलगाव धरणातून सर्रास शेतीसाठी पाणी उपसा केला जात आहे. याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा अरोप होत आहे.
४शेतीसाठी पाणी उपसा चालु राहिला तर धरणातील पाणी अवघ्या महिन्यातच संपू शकते, अशी भीतीही व्यक्त करण्यात येत आहे़