रक्तदानाची शंभरी ओलांडली !
By Admin | Updated: June 14, 2015 00:04 IST2015-06-14T00:04:49+5:302015-06-14T00:04:49+5:30
लातूर : लातुरात सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या चौघा जणांनी ‘रक्तदान हेच श्रेष्ठदान’ समजून रक्तदानाची परंपरा सुरू केली आहे़ आजपर्यंतच्या कालावधीत लातूरच्या रक्तदानाच्या

रक्तदानाची शंभरी ओलांडली !
लातूर : लातुरात सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या चौघा जणांनी ‘रक्तदान हेच श्रेष्ठदान’ समजून रक्तदानाची परंपरा सुरू केली आहे़ आजपर्यंतच्या कालावधीत लातूरच्या रक्तदानाच्या चळवळीत दोन रक्तदात्यांनी शंभरवेळा रक्तदान करून शंभरी ओलांडली आहे. तर अन्य दोघाजणांनी पंच्याहत्तरी ओलांडून विक्रम केला आहे. त्यांची प्रेरणा घेऊन ४० ते ५० हजार रक्तदात्यांनी गेल्या वर्षभरात रक्तदान केले आहे़
रक्तदान हेच श्रेष्ठदान समजून रक्तदानाची चळवळ सुरू ठेवणाऱ्यांमध्ये लातूरच्या चौघा जणांचा समावेश आहे़ दयानंद महाविद्यालयात बीक़ॉम पूर्ण केलेल्या या व्यक्तीला सामाजसेवेचा ध्यास लागल्यामुळे रक्तदानाच्या चळवळीत त्यांनी कायम योगदान दिले़ त्यांचा मुलगा व मुलगी उच्च शिक्षणासाठी परदेशात आहेत. न्यूयॉर्क व अमेरिकेत असलेल्या चापसी यांच्या मुलाने व मुलीने लातुरात आल्यानंतर दोन-चारवेळा रक्तदान केले आहे. चापसी यांच्या रक्तदान चळवळीमुळे ते दीडशे पुरस्कारांचे मानकरी ठरले. या पुरस्कारांना हुरळून न जाता त्यांनी आपल्या सेवेचा वसा कायम ठेवला आहे. आता वय झाल्यामुळे डॉक्टरांनी रक्तदान न करण्याचा सल्ला त्यांना दिला आहे.
१२७ वेळा रक्तदान केलेल्या चापसी यांची इंडिया बुक आॅफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. मराठवाड्यात इंडिया बुक आॅफ रेकॉर्डमध्ये नोंद झालेले चापसी एकमेव कार्यकर्ते आहेत. डॉक्टरांनी सल्ला दिल्यामुळे त्यांनी रक्तदान करणे थांबविले आहे. मात्र इतरांना प्रेरणा देऊन चळवळीचे काम गतीने सुरू ठेवले आहे.
सिग्नल कॅम्प भागात राहणाऱ्या सदानंद वैद्य या एसटी महामंडळाच्या विभागीय वर्कशॉपमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीने सेवानिवृत्तीनंतर रक्तदानाची ही चळवळ कायम राबविण्याचे काम केले आहे़ एसटी महामंडळाची नोकरी व नोकरी करीत जोपासलेली कायम रक्तदानाची परंपरा आजही कायम आहे़ वयाच्या १७ वर्षांपासून सुरू केलेली ही परंपरा सेवानिवृत्तीनंतरही सुरूच असल्याने त्यांनी केलेल्या रक्तदानाचा आकडा १०१ वर गेला आहे़
‘रक्तदान हेच श्रेष्ठदान’ समजून अनेकांना जीवदान देणाऱ्यांमध्ये महिलाही मागे नाहीत, हे करूणा सुभाष साळुंके या ४८ वर्षीय महिलेने दाखवून दिले आहे़ प्रकाशनगर भागात राहणाऱ्या महिलेने आतापर्यंत ७५ वेळा रक्तदान करून विविध आजाराने पीडित असलेल्या रूग्णांना रक्तदानाच्या माध्यमातून जीवदान देण्याचे काम केलेले आहे़ तर गायन क्षेत्रातील ‘उगवता तारा’ म्हणून ज्या गायकाकडे लातूरकर पाहतात त्या छोटू हिबारे या गायकानेही आपली गायकी सांभाळत सामाजिक बांधिलकी जपली आहे़ त्यांनी आतापर्यंतच्या कालावधीत ७५ वेळा रक्तदान केले असल्याचे जागतिक रक्तदान दिनानिमित्त साळुंके यांनी सांगितले.