१२ वर्षांपासून रक्तदान शिबिराचा उपक्रम
By Admin | Updated: April 10, 2015 00:26 IST2015-04-10T00:18:06+5:302015-04-10T00:26:36+5:30
समिर सुतके , उमरगा तालुक्यातील आंबेडकरी चळवळीचे केंद्र म्हणून येथील भिमनगरकडे पाहिले जाते. ४४ वर्षांची प्रदीर्घ परंपरा असलेल्या या जयंती मंडळाने मागील १२ वर्ष रक्तदान शिबिराचा

१२ वर्षांपासून रक्तदान शिबिराचा उपक्रम
समिर सुतके , उमरगा
तालुक्यातील आंबेडकरी चळवळीचे केंद्र म्हणून येथील भिमनगरकडे पाहिले जाते. ४४ वर्षांची प्रदीर्घ परंपरा असलेल्या या जयंती मंडळाने मागील १२ वर्ष रक्तदान शिबिराचा उपक्रम राबविला असून, गेल्या वर्षी १२२ जणांनी या शिबिरात सहभाग नोंदविला होता. विशेष म्हणजे हे जयंती मंडळ कसलीही वर्गणी न मागता आपआपसात रक्कम उभारुन जयंती साजरी करते.
भिमनगरमधील भिमराव सरपे, कॉम्रेड कांबळे, कृष्णा कांबळे, सागर सरपे, सुभाष सोनकांबळे, श्रीधर सरपे, विश्वास सोनकांबळे, सहदेव सोनकांबळे, सतीश सुरवसे, विजय सरपे, राहुल सरपे, श्रीधर सरपे आदी प्रमुख पदाधिकारी जयंती उत्सवाचे नियोजन करतात. १९७१ साली याच भिमनगरमध्ये पहिली जयंती साजरी करण्यात आली होती. कार्यकर्त्यांनी जाड कागदाच्या पुठ्यावर आंबेडकरांचे चित्र काढून या प्रतिमेची मिरवणूक काढली होती. तेव्हापासून येथे जयंती साजरी केली जाते. मार्च महिन्याच्या मध्यावर कमिटीची बैठक होते. जयंती मिरवणूक तसेच इतर उपक्रमात सर्वच समाजाचा सहभाग असला तरी मंडळाकडून कोणालाही जयंतीची वर्गणी मागितली जात नाही. त्यामुळे पावती बुकही झापले जात नाही. बैठकीला उपस्थित असलेले कार्यकर्ते स्वखुशीने वर्गणी ठरवितात. चांगली आर्थिक बाजू असलेल्यांना अधिक रक्कम तर कामगार तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्यांना त्यांच्या कुवतीनुसार रक्कम आकारली जाते. येथील अनेकजण बाहेरगावी वास्तव्यास आहेत. तेही स्वखुशीने वर्गणी देवून या उत्सवात सहभागी होतात. महत्वाचे म्हणजे जमा झालेल्या वर्गणीचा मंडळाकडून चोख हिशोब ठेवण्यात येतो. हा हिशोब पुढीलवर्षी जयंतीपूर्वी लेखी स्वरुपात सर्वांपुढे सादर केला जातो.