छत्रपती संभाजीनगर : महापालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणूक तोंडावर भाजपने शहर व ग्रामीण भागात ‘मोदी@११’ चा नारा देण्यास सुरुवात केली आहे. या उपक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आजवरच्या कार्यकाळात समाजाेपयोगी आणलेल्या योजनांचे प्रदर्शनही आयएमए हॉलमध्ये भरविण्यात आले आहे. तसेच, शहर व ग्रामीणमधील मंडळांतर्गत बैठका घेण्यात येणार आहेत. बुथ लेव्हल, चौपाल सभा, प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये सभा घेऊन ‘मोदी@११’ चा नारा देण्यात येणार आहे.
खा. डॉ. भागवत कराड, ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे, आ. अनुराधा चव्हाण, शहराध्यक्ष किशोर शितोळे यांनी किरण पाटील, लक्ष्मीकांत थेटे, जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाट, हर्षवर्धन कराड, समीर राजूरकर, जालिंदर शेंडगे यांच्या उपस्थितीत ‘मोदी@११’ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती सोमवारी पत्रकार परिषदेत देण्यात आली.
११ वर्षांत मराठवाड्यात आयआयटी, एम्स का आले नाही?११ वर्षांत मराठवाड्याला भरपूर मिळाल्याचा दावा भाजपने केला. मराठवाड्याचा विकास झाला, तर विकसित भारतात त्याचा समावेश असेलच, या प्रश्नाला बगल देत लोककल्याणकारी योजनांसह उद्योगांच्या गुंतवणुकीचा हवाला देत भाजप नेत्यांनी पत्रकारांच्या थेट प्रश्नाला उत्तरे देणे टाळले. आयआयटी नागपूरला गेले. एम्स मिळाले नाही. भारतमाला योजना संपुष्टात येत असून, शहरातील अखंड उड्डाणपुलाचे काय झाले? यावर खा. डॉ. कराड म्हणाले, शहरातील अखंड उड्डाणपुलाचा प्रस्ताव पाइपलाइनमध्ये आहे. त्याला मंजुरी मिळेलच. एम्स येण्यासाठी निकष असतात, त्यानुसार प्रयत्न सुरू आहेत. शहराध्यक्ष शितोळे म्हणाले, वजन कमी करू, सुदृढ राहू, मेडिकल कॉलेजऐवजी रस्ते, पाणी, वीज देऊ असा विचार ‘मन की बात’ मधून पंतप्रधान देत आहेत. त्यामुळे मेडिकल कॉलेजऐवजी आरोग्यदायी होण्याकडे आपला कल असला पाहिजे.
शहर कार्यकारिणी पुढच्या महिन्यातभाजप शहर कार्यकारिणीची निवड पुढच्या महिन्यांत होईल, असे शितोळे म्हणाले. मंडळ अध्यक्ष निवड झाली असून, उर्वरित कार्यकारिणी स्थापन होईल. त्यानंतर शहर कार्यकारिणीतील सरचिटणीस, उपाध्यक्ष, चिटणीस, सदस्यांची निवड होईल.