शंभर रेशन दुकानांत एप्रिलपूर्वी बायोमेट्रिक
By Admin | Updated: December 12, 2014 00:55 IST2014-12-11T23:39:57+5:302014-12-12T00:55:14+5:30
औरंगाबाद : जिल्ह्यात येत्या मार्चअखेरपर्यंत आणखी शंभर रेशन दुकानांवर बायोमेट्रिक पद्धत लागू करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी विक्रम कुमार यांनी सांगितले.

शंभर रेशन दुकानांत एप्रिलपूर्वी बायोमेट्रिक
औरंगाबाद : अन्नधान्य आणि साखरेच्या काळ्याबाजाराला आळा घालण्यासाठी जिल्ह्यात येत्या मार्चअखेरपर्यंत आणखी शंभर रेशन दुकानांवर बायोमेट्रिक पद्धत लागू करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी विक्रम कुमार यांनी सांगितले.
शासनाकडून स्वस्त धान्य दुकानांमार्फत दर महिन्याला सवलतीच्या दरात गहू, तांदूळ, साखर, केरोसिनचा पुरवठा केला जातो; मात्र यामध्ये तेवढ्याच मोठ्या संख्येने काळा बाजार होतो. अनेक दुकानदार लाभार्थ्याला धान्य न देताच कागदोपत्री दिल्याचे दाखवून काळ्या बाजारात विकतात. याला आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने दीड वर्षासाठी प्रायोगिक तत्त्वावर बायोमेट्रिक पद्धत लागू केली.
लाभार्थ्याच्या अंगठ्याचा ठसा जुळल्यानंतरच त्याला अन्नधान्य देण्याची तरतूद यामध्ये आहे. या बायोमेट्रिक मशीन मुंबईतील सर्व्हरशी आॅनलाईन जोडल्या गेलेल्या आहेत, त्यामुळे कोणत्या लाभार्थ्याने धान्य उचलले किंवा कोणी उचलले नाही, हे समजते. सध्या जिल्ह्यात २९ दुकानांवर ही पद्धत लागू करण्यात आली आहे; मात्र लवकरच त्याचा विस्तार करण्यात येणार असून मार्चअखेरपर्यंत जिल्ह्यातील आणखी १०० रेशन दुकानांवर बायोमेट्रिक मशीन बसविल्या जाणार आहेत.
सर्व तालुक्यांच्या ठिकाणी किमान दहा ते बारा दुकानांवर हे लागू केले जाईल, असेही जिल्हाधिकारी विक्रम कुमार यांनी आज सांगितले.