भीमाचा किल्ला, बीड जिल्हा..!
By Admin | Updated: April 15, 2017 00:13 IST2017-04-15T00:09:47+5:302017-04-15T00:13:19+5:30
बीड : अमाप उत्साहात शुक्रवारी जिल्ह्यात घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी झाली.

भीमाचा किल्ला, बीड जिल्हा..!
बीड : ‘एकच साहेब .. बाबासाहेब..!, ‘भीमाचा किल्ला- बीड जिल्हा’ असा जयघोष... ढोल ताशांचा गजर... भीमगीतांवर थिरकणारी पावले... अशा अमाप उत्साहात शुक्रवारी जिल्ह्यात घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी झाली. शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी अभिवादन कार्यक्रम पार पडले. यावेळी निळा जनसागर लोटला होता.
शुक्रवारी सकाळी सात वाजता भारतीय बौद्ध महासभेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून रॅलीला प्रारंभ झाला. प्रमुख मार्गावरुन निघालेली ही रॅली डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ दाखल झाली तेथे भदंत शिवली बोधी यांच्या उपस्थितीत पंचशील ध्वजारोहण झाले. त्रिशरण व पंचशील ग्रहण केल्यानंतर अभिवादन कार्यक्रम पार पडला. जिल्हाधिकारी नवल किशोर राम, अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपअधीक्षक गणेश गावडे, नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर, माजी आ. राजेंद्र जगताप, रिपाइंचे युवा प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे, जि.प. सदस्य संदीप क्षीरसागर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विकास मंचचे डॉ. जितेंद्र ओव्हाळ, अजिंक्य चांदणे, प्रा. प्रदीप रोडे, अशोक तांगडे, तत्वशील कांबळे, विकास जोगदंड, राहुल वाघमारे, राजू जोगदंड, मनीषा तोकले, अजय सवई, मुकुंद धुताडमल, बबन वाघमारे, अशोक वाघमारे, माणिक वाघमारे, तसेच सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी लहान मुले, महिलांची लक्षणीय उपस्थिती होती. आबाल वृद्धांच्या गर्दीचे रुपांतर अक्षरश: जनसागरात झाले. विविध पक्ष, संघटना, मित्रमंडळाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी जयभीमच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला.
सायंकाळी सहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून मिरवणुकीला प्रारंभ झाला. फुलांनी सजविलेल्या आकर्षक रथात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा ठेवण्यात आली होती. रथाच्या रोषणाईने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी ‘कसा शोभला असता भीम नोटावर’, ‘लई मजबूत भीमाचा किल्ला’ आदी भीमगीतांवर तरुणाई थिरकली. बच्चेकंपनींसह वृद्धांंनाही ढोल ताशाच्या गजरावर ठेका धरण्याचा मोह आवरता आला नाही.