साखरेपेक्षा गुळाला ‘भाव’
By Admin | Updated: April 24, 2016 00:14 IST2016-04-24T00:05:19+5:302016-04-24T00:14:21+5:30
औरंगाबाद : ऊस व पाण्याच्या कमतरतेमुळे गुऱ्हाळाची संख्या घटली असून, परिणामी गुळाचे भाव कडाडले आहेत.

साखरेपेक्षा गुळाला ‘भाव’
औरंगाबाद : ऊस व पाण्याच्या कमतरतेमुळे गुऱ्हाळाची संख्या घटली असून, परिणामी गुळाचे भाव कडाडले आहेत. मागील १० वर्षांनंतर पहिल्यांदाच लातूर येथील गावरान गुळाच्या भावाने क्विंटलमागे ४००० रुपयांची सीमा गाठली आहे. किरकोळ ते मध्य ४२ रुपये किलोने गूळ विकल्या जात आहे. अशीच परिस्थिती राहिली तर आणखी भाववाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. गूळ आरोग्यास लाभदायक असल्याने साखरेपेक्षा गूळ ‘भाव’ खाऊ लागला आहे.
उसापासून साखरही तयार होते व गूळही तयार होतो. गूळ आरोग्यास लाभकारक असतो. म्हणूनच तर पूर्वी उन्हातून घरी आलेल्या पाहुण्यांना गूळ व पाणी देत असत. आताही अनेक परिवारांनी जुन्या पद्धतीनुसार पाहुण्यांना खास गूळ व पाणी देणे सुरू केले आहे. अनेक डॉक्टर रुग्णांना गूळ खाण्याचा सल्ला देत असतात. यामुळे मागील चार ते पाच वर्षांत गुळाला मागणी वाढली आहे. औरंगाबादेत कराड, सांगली, पुणे या भागातून गूळ येत असतो. मात्र, लातूरच्या गावरान गुळाला औरंगाबादकर जास्त पसंत करतात. गूळ तयार करण्यासाठी जसा ऊस लागतो तसेच पाणीही मोठ्या प्रमाणात लागते. यंदा लातूर जिल्ह्यात भयंकर दुष्काळ पडला आहे. यामुळे उसाचे क्षेत्रही घटले आहे. ऊस कमी व पाणीही कमी, त्यामुळे यंदा फक्त ३० टक्केच गुऱ्हाळ सुरू झाले आहेत. यात हे गुऱ्हाळही बंद होण्याच्या मार्गावर आहे. परिणामी गुळाचे उत्पादन घटल्याने मागील साडेतीन महिन्यांत गुळाचे भाव क्विंटलमागे एकदम ९०० ते १००० रुपयांनी वाढले. सध्या ३७०० ते ४००० रु. क्विंटलपर्यंत गूळ विकला जात आहे. लातूर बाजारपेठेतून मागील आठवडाभरात ५० टन गुळाची आवक झाली. यासंदर्भात गुळाचे व्यापारी सुमतीशेठ ब्रह्मेचा यांनी सांगितले की, दरवर्षी दसऱ्यानंतर सांगली, कराड, कोल्हापूर तसेच उत्तर प्रदेशातील हापूड येथून गुळाची आवक होते. तर लातूरच्या गुळाचा हंगाम डिसेंबरपासून सुरूहोतो.