अग्निजन्य खडकामुळे बीड ‘सेफझोन’मध्ये
By Admin | Updated: May 15, 2015 00:50 IST2015-05-15T00:34:06+5:302015-05-15T00:50:47+5:30
बीड : जिल्ह्यात कठीण अग्निजन्य खडक (डेक्कन ट्रॅप) मोठ्या प्रमाणात आहे. असा खडक असलेल्या भागांत मोठा भूकंप झाल्याची नोंद अद्याप कोठेही झालेली नाही

अग्निजन्य खडकामुळे बीड ‘सेफझोन’मध्ये
बीड : जिल्ह्यात कठीण अग्निजन्य खडक (डेक्कन ट्रॅप) मोठ्या प्रमाणात आहे. असा खडक असलेल्या भागांत मोठा भूकंप झाल्याची नोंद अद्याप कोठेही झालेली नाही. त्यामुळे बीड ‘सेफझोन’मध्ये असून चिंता करण्याचे कारण नाही, असा दावा भूजल व सर्वेक्षण विभागातील वरिष्ठ भू- वैज्ञानिक बी. एस. मेश्राम यांनी केला.
भूकंपाच्या प्रकोपाने नेपाळमधील काठमांडू शहराला जबर हादरा बसला. पाठोपाठ उत्तर भारतातही भूकंप जाणवला. त्यानुषंगाने वरिष्ठ भू- वैज्ञानिक बी. एस. मेश्राम यांच्याशी गुरुवारी ‘लोकमत’ने बातचित केली. ते म्हणाले, १९९३ मध्ये लातूर जिल्ह्यातील किल्लारी, सास्तूर येथे भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्याचे धक्के संपूर्ण मराठवाड्याला बसले होते. एवढेच नाही तर बीड जिल्ह्यातील बालाघाटातील डोंगररांगांशी भूकंपाचे ‘कनेक्शन’ असल्याचा निर्वाळा भूवैज्ञानिकांनी दिला होता. त्यानंतर नागपूर येथील भूवैज्ञानिकांच्या पथकाने बीडमधील खडकांची पाहणी केली होती;परंतु लातुरातील भूकंपाशी संबंध असल्याचे पुरावे तेंव्हा सापडले नाहीत. लातूरमध्ये भूकंप झाला तेथे भूगर्भात दोन खडकांचा जोड आढळून आला होता. बीड जिल्ह्यातील खडक कठीण असून अशा प्रकारच्या खडकांमध्ये भूगर्भात भूकंपाची शक्यता कमी असते.
दरम्यान, स्तरीय खडक (सेलेमेंटरी) आढळल्यास भूकंपाचा धोका जास्त असतो. मात्र, बीड जिल्ह्यात असा खडक कोठेही नाही. त्यामुळे भूकंपाची भीती बाळगण्याचे कारण नाही, असेही मेश्राम यांनी स्पष्ट केले. भूकंपाबाबत विविध गैरसमज आहेत. मात्र, भूगर्भात नैसर्गिक हालचाली झाल्या तरच धोका असतो. पाणीपातळी खालावल्याने भूकंप होत नाही, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)