जीएसटीविषयी सकारात्मक व्हा ...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 23:54 IST2017-10-07T23:54:39+5:302017-10-07T23:54:39+5:30
विद्यार्थ्यांनी जीएसटीत होणा-या बदलाचे अद्ययावत ज्ञान सतत आत्मसात केले पाहिजे, असे आवाहन सीए. उमेश शर्मा यांनी केले.

जीएसटीविषयी सकारात्मक व्हा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : वस्तू व सेवा करप्रणाली ही भारताच्या अर्थकारणात क्रांतिकारी पाऊल आहे. सध्या काही तांत्रिक अडचणी येत आहेत, पण भविष्य उज्ज्वल आहे. या करप्रणालीकडे सकारात्मकपणे पाहिले पाहिजे. विद्यार्थ्यांनी जीएसटीत होणा-या बदलाचे अद्ययावत ज्ञान सतत आत्मसात केले पाहिजे, असे आवाहन सीए. उमेश शर्मा यांनी केले.
डॉ. इंदिराबाई भास्करराव पाठक महाविद्यालयातर्फे आयोजित ‘जीएसटीचे सामाजिक व आर्थिक परिणाम’ यावरील चर्चासत्रात ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून जीएसटी विभागाचे सहायक आयुक्त प्रसन्न दातार होते. अध्यक्षस्थानी अॅड. जे. के. वासडीकर हे होते. यावेळी अॅड. कल्पलता पाटील भारस्वाडकर, डॉ. सुनंदा चक्रनारायण, डॉ.सुनीता बाजपाई तसेच विधि महाविद्यालयाचे प्राचार्य सी. एम. राव यांची प्रमुख उपस्थिती होती. विविध शाखांमधील विषयतज्ज्ञांनी जीएसटीवरील २०० शोधनिबंध सादर केले. या शोधनिबंधांची स्मरणिका यावेळी प्रकाशित करण्यात आली.
उमेश शर्मा म्हणाले की, सध्या जे संघटित उद्योग क्षेत्र आहे ते जीएसटीमुळे आनंदीत आहे, पण असंघटित क्षेत्राला करप्रणालीत अडचणी येत आहेत. मुख्यत: जीएसटीएन नेटवर्कमधील तांत्रिक समस्या निर्माण झाल्या आहेत, पण भविष्यात या समस्या मिटतील व जीएसटीने देशाचा आर्थिक व्यवस्थेचा विकास होईल हे निश्चित.
प्रसन्न दातार यांनी जीएसटी म्हणजे काय, केंद्र व राज्य जीएसटी म्हणजे काय हे सांगितले. जीएसटी ही सर्वोत्तम करप्रणाली असल्याचा उल्लेख त्यांनी केला. अॅड. वासडीकर म्हणाले की, १ जुलैला जरी जीएसटी लागू झाला, पण अजूनही त्यात सुधारणा करणे सुरू आहे. जीएसटीची तयारी रात्रीतून झाली नाही. मागील १० वर्षे अभ्यास करून करप्रणाली तयार करण्यात आली, असेही त्यांनी सांगितले. प्रारंभी, प्राचार्या व्ही. व्ही. पुरोहित यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन करून प्रा.अनुया चांदोरकर यांनी आभार मानले.