अन्ननलिकेत अडकलेला बॅटरीचा सेल काढला
By Admin | Updated: May 27, 2014 01:23 IST2014-05-27T01:17:36+5:302014-05-27T01:23:33+5:30
औरंगाबाद : बॅटरीचा सेल गिळल्यामुळे मृत्यूच्या दाढेत गेलेल्या अवघ्या एक वर्षाच्या बालिकेचे प्राण वाचविण्यात घाटीतील कान, नाक व घसा विभागाच्या डॉक्टरांना यश आले.

अन्ननलिकेत अडकलेला बॅटरीचा सेल काढला
औरंगाबाद : घरात खेळत असताना जमिनीवर पडलेला गोलाकार बॅटरीचा सेल गिळल्यामुळे मृत्यूच्या दाढेत गेलेल्या अवघ्या एक वर्षाच्या बालिकेचे प्राण वाचविण्यात घाटीतील कान, नाक व घसा विभागाच्या डॉक्टरांना यश आले. नंदिनी अंकुश गायकवाड (रा. गालण, बुद्रुक, ता. पाचोरा, जि. जळगाव) ही एक वर्षीय बालिका २२ मे रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घरात खेळत होती. त्यावेळी तेथे बॅटरीचा एक सेल पडलेला होता. पन्नास पैशांच्या आकाराचा हा गोलाकार सेल नंदिनीच्या हातात पडला. त्याच्यासोबत खेळत असताना तिने तो गिळला. काही वेळाने तिला उलट्यांचा त्रास होऊ लागला आणि ती रडू लागल्याने हा प्रकार तिच्या आईच्या लक्षात आला. आई-वडिलांनी तिला तातडीने गावातील खाजगी डॉक्टरांना दाखविले. तिला तातडीने जळगाव येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्याचा सल्ला देण्यात आला. जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टरांनी नंदिनीवर प्रथमोचार केले आणि तिला औरंगाबादेतील घाटी रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितले. २२ मे रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास अपघात विभागात नंदिनीला आणण्यात आले. तिचा एक्स-रे काढण्यात आल्यानंतर पैशासारखा दिसणारा सेल अन्ननलिकेच्या वरच्या भागात अडकल्याचे निदर्शनास आले. निवासी डॉक्टरांनी ही बाब विभागप्रमुख डॉ. जीवन वेदी यांना सांगितली. डॉ. वेदी यांनी त्या मुलीची तपासणी केल्यानंतर तिच्या रक्ताच्या आणि भूलशास्त्राच्या तपासण्या करण्यास सांगितले. या तपासण्या रात्रीतून पूर्ण करण्यात आल्या. २३ मे रोजी सकाळी ८ वाजता डॉ. वेदी यांनी दुर्बिणीद्वारे चिमुकलीच्या अन्ननलिकेतील सेल बाहेर काढला. यावेळी त्यांना सहायक प्राध्यापक डॉ. अनुश्री बजाज, डॉ. धर्मेंद रॉय, डॉ. मीनाक्षी साळुंके यांनी सहकार्य केले. भूल देण्याचे काम डॉ. ज्योती कुलकर्णी यांनी केले. याविषयी डॉ. वेदी यांनी सांगितले की, अधिष्ठाता डॉ. के.एस. भोपळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही उपचार करण्यात आले. नंदिनीच्या अन्ननलिकेत सेल अडकून २० तासांचा कालावधी उलटला होता. त्यातील केमिकल बाहेर पडत असल्याने तिच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. वेळीच उपचार करून सेल बाहेर काढणे गरजेचे होते. बालकांची काळजी घ्यावी घरात खेळणारे बालक हे जमिनीवर पडलेली वस्तू उचलून तोंडात घालत असते. अशा वस्तू अन्ननलिकेत अडकल्यास त्याच्यासाठी प्राणघातक ठरू शकतात. त्यामुळे अशा वस्तू त्याच्यापासून दूर ठेवण्याची जबाबदारी पालकांची असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.