‘नो ड्यूज’साठी बँकेत पिळवणूक
By Admin | Updated: June 17, 2014 01:11 IST2014-06-17T00:31:34+5:302014-06-17T01:11:49+5:30
दिनेश गुळवे , बीड जिल्ह्यातील विविध बॅँकांतून शेतकरी सध्या पीक कर्ज काढीत आहेत.

‘नो ड्यूज’साठी बँकेत पिळवणूक
दिनेश गुळवे , बीड
जिल्ह्यातील विविध बॅँकांतून शेतकरी सध्या पीक कर्ज काढीत आहेत. पीक कर्जासाठी शेतकऱ्यांना आठ ते दहा बॅँकांचे नो ड्युज (बे बाकी प्रमाणपत्र) लागतात. यासाठी शेतकऱ्यांना विविध बॅँकात खेटे घालावे लागत आहेत. काही बॅँका नोड्युजसाठी अनधिकृत पैसेही उखळत आहेत. गांभीर्याची बाब म्हणजे ५० हजार रुपये पीक कर्जासाठी सरसकट नो ड्युजची आवश्यकता नसताना शेतकऱ्यांकडून सर्रास नो ड्युजसाठीची रक्कम घेतली जात आहे.
जून सुरू होताच शेतकऱ्यांना पेरणीचे वेध लागले आहेत. अनेकदा शेतकऱ्यांकडे मशागत, बियाणे खरेदी, लागवड, खत, फवारणी आदींसाठी पैसे नसतात. शेतकऱ्यांवर आर्थिक पेचप्रसंग ओढावू नये यासाठी शेतकऱ्यांना विविध बॅँकांकडून पीक कर्ज उपलब्ध करून दिले जाते. महत्त्वाची बाब म्हणजे तीन लाख रुपये पर्यंतच्या कर्जाची वेळेत परतफेड केल्यास त्यावरील व्याजाची रक्कम शासनाकडून भरली जाते व ही रक्कम नंतर शेतकऱ्यांना परत मिळते. अशा फायद्यामुळे व वेळेवर पैसे मिळत असल्याने अनेक शेतकरी पीक कर्ज काढतात.
अनेक शेतकऱ्यांकडे अल्प शेती असल्याने त्यांना दहा ते वीस हजार रुपये पीक कर्ज मिळते. असे कर्ज घेण्यासाठीही शेतकऱ्यांना आठ ते दहा बॅँकांचे नो ड्युज द्यावे लागतात. वास्तविक तो शेतकरी थकबाकीदार नसेल तर त्याला नो ड्युजची आवश्यकता नाही, अशा शेतकऱ्याने शंभर रुपयांच्या स्टॅम्पवर लिहून दिले तरी बॅँक कर्ज देऊ शकतात. असे असले तरी काही बॅँका दहा ते वीस हजार कर्जासाठीही नो ड्युज घेत असल्याचा आरोप शेतकरी संघटनेचे मराठवाडा प्रमुख कालीदास आपेट यांनी केला आहे. गेवराई तालुक्यातील मादळमोही येथील डीसीसीच्या शाखेतून शेतकऱ्याकडे सातबारा, बॅँकेचे पत्र असतानाही नो ड्युज साठी पैसे घेतल्याचा प्रकार अलिकडेच समोर आला होता. सदर बाब शेतकऱ्यांनी बॅँकेचे मुख्याधिकारी कदम यांना सांगितली होती. यानंतर हा प्रकार थांबविण्यात आला. या संदर्भात कदम म्हणाले, नो ड्युज साठी पैसे घेऊ नये, अशा सूचना दिल्या आहेत. यानंतरही पैसे घेतल्यास शेतकऱ्यांनी तक्रार करावी. यासह गेवराई येथील इतरही काही बॅँकांतून नो ड्युजसाठी पैसे घेतले जात असल्याचा आरोप अक्षय पवार यांनी केला आहे.
गेवराई तालुक्यातील शेतकऱ्यास पीककर्ज हवे असेल तर सात ते आठ बॅँकांचे नो ड्युज लागतात. या प्रत्त्येक बॅँकेचे नो ड्युज देण्याचे वेगवेगळे दिवस असल्याने शेतकऱ्यांना चार ते पाच वेळा खेटे घालावे लागतात. यामुळे तालुक्यातील सर्वच बॅँकांनी नो ड्युज देण्याचे ‘वार’ सारखेच ठेवण्याची मागणी रायगड संघटनेचे प्रा. आसाराम पवळ यांनी केली आहे.
दरम्यान, अशा प्रकारामुळे शेतकऱ्यांची पिळवणूक होत असून हे प्रकार थांबविण्याची मागणी शेकापचे जिल्हाध्यक्ष भाई मोहन गुंड यांनी केली आहे.
३० जून पर्यंत कर्ज भरावे
ज्या शेतकऱ्यांनी पीककर्ज घेतले आहे, त्यांनी आपले कर्ज १ वर्षाच्या आत किंवा ३० जून पर्यंत भरावे, असे अग्रणी बॅँकेचे व्यवस्थापक बोकाडे यांनी सांगितले. तीन लाखांपर्यंतचे कर्ज घेऊन मुदतीत फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना व्याज माफीची सवलत मिळते, असेही बोकाडे म्हणाले. तसेच जे बॅँक अधिकारी ५० हजार रुपयांपर्यंतच्या पीककर्जासाठी सरसकट नो ड्युज प्रमाणपत्र बंधनकारक करतात, यासंबंधी शेतकऱ्यांनी संबंधित बॅँकेचे प्रमुख कार्यालय अथवा आपल्याकडेही तक्रार करू शकतात, असेही ते म्हणाले.
सातबारा, पत्र असतानाही शुल्क
पीक कर्जासाठी बॅँकेचे पत्र असेल व संबंधित शेतकऱ्यांकडे स्वत:चा सातबारा असेल, तर अशावेळी नो ड्युज विना शुल्क मिळते. मात्र, बॅँकेचे पत्र व सातबारा असतानाही जिल्ह्यातील काही बॅँका शेतकऱ्यांकडून पैसे घेऊन त्यांची आर्थिक लूट करीत आहेत. जिल्ह्यात शेतकऱ्यांची होणारी ही लूट थांबवावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
नियम काय सांगतो?
५० हजार रुपयांपर्यंत पीक कर्ज हवे असेल तर थकबाकीदार नसलेल्या शेतकऱ्यांसाठी नो ड्युजची आवश्यकता नाही. अशा शेतकऱ्यांनी बॅँकेकडे शंभर रुपयांच्या स्टॅम्पवर लिहून दिल्यानंतर संबंधित बॅँक कर्ज देऊ शकतात, असे अग्रणी बॅँकेचे व्यवस्थापक बोकाडे यांनी सांगितले.