पालिकेला पाऊण कोटींची अनामत
By Admin | Updated: August 10, 2015 00:57 IST2015-08-10T00:51:07+5:302015-08-10T00:57:20+5:30
कळंब : नगर परिषदेने शहरातील विश्रामगृहासमोर बांधलेल्या टपरी गाळ्याच्या लिलावामध्ये जवळपास पाऊण कोटी रुपयाची अनामत रक्कम जमा झाली आहे

पालिकेला पाऊण कोटींची अनामत
कळंब : नगर परिषदेने शहरातील विश्रामगृहासमोर बांधलेल्या टपरी गाळ्याच्या लिलावामध्ये जवळपास पाऊण कोटी रुपयाची अनामत रक्कम जमा झाली आहे. ७ आॅगस्ट रोजी या गाळ्याचा लिलाव करण्यात आला.
शहरातील विश्रामगृहासमोरील पाण्याच्या टाकीच्या संरक्षक भिंतीला लागून हे २१ टपरी गाळे बांधण्यात आले आहेत. या गाळ्यासाठी नगर परिषदेचे कार्यालयीन अधीक्षक कलिमोद्दीन मुल्ला तसेच नगरसेवक व नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत ७ आॅगस्ट रोजी लिलाव पुकारण्यात आले होते.
२५ हजार रुपये अनामत रक्कम भरून अनेकांनी या प्रक्रियेत सहभाग घेतला होता. या लिलावामध्ये या टपरी गाळ्यासाठी चढ्या दराने बोली लावण्यात आली होती. एका गाळ्यासाठी अडीच लाखाच्या पुढेच बोली लावण्यात आली. एका गाळ्याला सर्वाधिक साडेचार लाख रुपयाची बोली लागली.
व्यवसायिकांना हक्काची जागा
नगर पालिका परिसरात सर्वत्र शासकीय कार्यालये आहेत. त्यामुळे झेरॉक्स, चहा, उपहारगृहे, जॉबवर्क, वडापाव असे लहानसहान व्यवसाय करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. परिसरात खाजगी व्यक्तींची जागा नसल्यामुळे या व्यवसायिकांना रस्त्याच्या कडेला अतिक्रमणे करून व्यवसाय थाटावे लागले होते. प्रशासनाने अतिक्रमण हटाव मोहीम राबविली की, सर्वात आधी या व्यवसायिकांची धावाधाव होत असे. या नगर परिषद दुकानगाळ्यामुळे या परिसरातील छोट्या व्यवसायिकांची काही अंशी सोय होणार आहे.