दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी
By Admin | Updated: April 25, 2016 00:34 IST2016-04-24T23:58:36+5:302016-04-25T00:34:10+5:30
जालना : सत्ता येते आणि जाते, सत्ता आली म्हणून माजू नये, तर सत्ता नसेल तर लाजू नये, या सूत्राप्रमाणे भाजपाने आतापर्यंत काम केलेले आहे.

दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी
जालना : सत्ता येते आणि जाते, सत्ता आली म्हणून माजू नये, तर सत्ता नसेल तर लाजू नये, या सूत्राप्रमाणे भाजपाने आतापर्यंत काम केलेले आहे. सत्तेत नसतानाही लोकांच्या समस्या सोडविण्याचे काम पक्षाने केले आहे. आमचे प्रेम लाल दिव्यावर नसून, लोकांच्या समस्या सोडविण्यावर आहे. सरकार दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी आहे, असे प्रतिपादन अर्थमंंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी रविवारी येथे केले.
राहुल लोणीकर मित्रमंडळाच्या वतीने आयोजित सामूहिक विवाह सोहळ्यात ते बोलत होते. व्यासपीठावर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, महसूल मंत्री एकनाथ खडसे, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, आ.अर्जुन खोतकर, आ. राजेश टोपे, आ. नारायण कुचे, आ. तानाजी मुटकुळे, आ. अतुल सावे, आ. प्रशांत बंब, सुरजितसिंग ठाकूर, गजानन महाराज शास्त्री, सिध्दलिंग स्वामी, वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष प्रकाश महाराज बोधले, शेषराव बाहेकर आदी उपस्थित होते.
याप्रसंगी शिव प्रतिमेचे पूजन करुन सोहळ्यास प्रारंभ करण्यात आला. मुनगंटीवार म्हणाले की, सध्या मराठवाड्यात दुष्काळी स्थिती असल्याने शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी सर्वत्या उपाययोजना केल्या जात आहेत. असे असले तरी पक्ष म्हणून सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी सामूहिक विवाह सोहळा पक्षाच्यावतीने आयोजित केला जात आहे. या सोहळ्यातून दुष्काळग्रस्तांना दिलासा मिळत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री एकनाथ खडसे हे दुष्काळ निवारणासाठी काम करत आहेत. पण स्थिती बिकट आहे. अशावेळी जनतेच्या पाठीशी राहणे गरजेचे आहे. ते पक्षाच्यावतीने केले जात असल्याचे मुनगंटीवार म्हणाले.
महसूलमंत्री खडसे म्हणाले की, सामूहिक विवाह सोहळ्यात आंतरजातीय विवाह करणाऱ्यांसाठी शासनाच्यावतीने ५० हजार रुपयांची मदत केली जात आहे. अशा प्रकारच्या सोहळ्यातून दुष्काळग्रस्तांचे अश्रू पुसण्याचे काम होत आहे. मराठवाड्यातील निम्न दूधना प्रकल्पातून लातूरसाठी पाणी देण्याचा निर्णय लवकरच घेण्यात येणार आहे. यासाठी आजच आपण परतूर शहरातील जलशुध्दीकरण केंद्राची पाहणी केली असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
पालकमंत्री लोणीकर म्हणाले, दुष्काळ व गारपिटीने शेतकरी हतबल झाला आहे. त्यातून आत्महत्या वाढत आहेत. त्यांच्या मुलींच्या लग्नाची जबाबदारी घेतली पाहिजे, या विचारातूनच हा सोहळा आयोजित केला आहे. या सोहळ्यात सहभाग घेणाऱ्या जोडप्यांना शासनाच्यावतीने शौचालय बांधून देण्यात येणार आहे. तसेच त्यांना संसारपयोगी साहित्यही दिले जाणार असल्याचे ते म्हणाले.
दुष्काळी स्थितीमुळे शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्न बिकट झाले आहेत. सरकार ते सोडविण्यासाठी कटिबध्द आहे. मुलींच्या लग्नासाठी आर्थिक तरतूद होत नसल्याने अनेक शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. या पार्श्वभूमीवर बबनराव लोणीकर आणि राहुल लोणीकर यांनी आयोजित केलेला सोहळा महत्वाचा ठरतो.
- हरिभाऊ बागडे,
विधानसभा अध्यक्ष
हा विवाह सोहळा यशस्वी करण्यासाठी दोन महिन्यांपासून १ हजार कार्यकर्ते रात्रंदिवस झटत होते. वऱ्हाडी व जोडप्यांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आल्याने त्यांची गैरसोय टळली. विवाह सोहळ्याबरोबरच काही दिवसांपूर्वी महाआरोग्य शिबीरही घेतले. याचा साडेतीन हजार रुग्णांना लाभ झाला.
-बबनराव लोणीकर, पालकमंत्री