बीबी का मकबरा ते औरंगाबाद लेणीपर्यंतच्या रस्ता रुंदीकरणाचे खंडपीठाचे आदेश; शासनाने निधी देण्याचेही निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 22:53 IST2018-10-30T22:53:09+5:302018-10-30T22:53:49+5:30
बीबी का मकबरा ते औरंगाबाद लेणीपर्यंतचा रस्ता शहर विकास आराखड्यानुसार २४ मीटर रुंदीचा करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. ता. वि. नलावडे आणि न्या. व्ही. व्ही. कंकणवाडी यांनी मंगळवारी (दि.३०) राज्य शासनास दिले.

बीबी का मकबरा ते औरंगाबाद लेणीपर्यंतच्या रस्ता रुंदीकरणाचे खंडपीठाचे आदेश; शासनाने निधी देण्याचेही निर्देश
औरंगाबाद : बीबी का मकबरा ते औरंगाबाद लेणीपर्यंतचा रस्ता शहर विकास आराखड्यानुसार २४ मीटर रुंदीचा करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. ता. वि. नलावडे आणि न्या. व्ही. व्ही. कंकणवाडी यांनी मंगळवारी (दि.३०) राज्य शासनास दिले. यासाठी आवश्यक निधी राज्य शासनाने तीन महिन्यांत द्यावा. निधी मिळाल्यापासून पुढील सहा महिन्यांत रस्ता रुंदीकरण आदी अनुषंगिक कामे पूर्ण करावीत, असे निर्देश दिले.
रस्त्यालगतची अतिक्रमणे काढावीत. संबंधित मालमत्तांच्या कायदेशीर मालकांना ‘टीडीआर’ किंवा भरपाई द्यावी, असे निर्देशही खंडपीठाने दिले आहेत. हा रस्ता केंद्र शासनाने स्वत:कडे घ्यावा, अशी अपेक्षा खंडपीठाने व्यक्त केली आहे.
बीबी का मकबऱ्यापासून औरंगाबाद लेणीपर्यंतच्या रस्त्याची दुरवस्था झाल्यामुळे त्याचा पर्यटनावर परिणाम झाला आहे. या रस्त्याचे आणि पथदिव्यांचे काम त्वरित करण्याची विनंती परेश बदनुरे (रा. पहाडसिंगपुरा) यांनी २०१६ मध्ये खंडपीठात जनहित याचिकेद्वारे केली आहे.
बीबी का मकबरा येथे देश-विदेशातून येणाºया पर्यटकांची संख्या मोठी असून, येथून औरंगाबाद लेणी अवघ्या अडीच किलोमीटरवर आहे. औरंगाबाद लेणीसुद्धा जगप्रसिद्ध असून, या ठिकाणी बौद्ध लेण्या आहेत. पर्यटक वरील दोन्ही स्थळांना भेटी देण्यासाठी येतात. औरंगाबाद लेणीच्या पायथ्याशी दरवर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त मोठा उत्सव असतो. मकबरा ते औरंगाबाद लेणी रस्ता १९९० च्या शहर विकास आराखड्यानुसार २४ मीटर रुंदीचा पाहिजे; मात्र सध्या या रस्त्याची रुंदी केवळ ६ मीटरच आहे. गेल्या २८ वर्षांत या रस्त्याचे रुंदीकरण झाले नाही, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. या रस्त्याचे काम त्वरित करण्यात यावे, रस्त्यावर पथदिवे लावावेत, महापालिकेने येथील नागरिकांना टीडीआर द्यावा व अनधिकृत बांधकामे थांबवावीत, अशी विनंती याचिकेत केली आहे.
याचिकाकर्त्याची बाजू अॅड. रूपेश जैस्वाल यांनी मांडली. शासनातर्फे मुख्य सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे आणि महापालिकेतर्फे अॅड. आनंद भंडारी यांनी काम पाहिले.
चौकट
जागतिक कीर्तीच्या पर्यटनस्थळाकडे दुर्लक्ष
बीबी का मकबºयासमोरून औरंगाबाद लेणीकडे जाणारा रस्ता अरुंद झाला आहे. बीबी का मकबºयातील डाव्या बाजूच्या मनोºयावर जवळपास सहा फुटांचे झाड उगवल्याचा उल्लेख न्या. नलावडे यांनी सुनावणीच्या वेळी केला. यावरून मकबºयासारख्या जागतिक कीर्तीच्या पर्यटनस्थळाकडे शासनाचे किती दुर्लक्ष आहे, ही बाब निदर्शनास येते.