औरंगाबाद : कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्याच्या तुलनेत शहरात कोरोना रुग्ण सापडण्याचे प्रमाण अधिक आहे. जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट १२.३ टक्के आहे. पण त्याउलट शहराचा पॉझिटिव्हिटी रेट तब्बल १५ टक्क्यांवर गेला आहे. गतवर्षी ठरावीक भागात मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळत होते. त्यामुळे हे भाग कोरोनाचे हाॅटस्पाॅट ठरत होते. परंतु सध्या रोज शहरातील विविध भागांत कोरोनाचे रुग्ण आढळत असल्याने चिंता व्यक्त होत आहे.
जिल्ह्यात आजघडीला रोज जवळपास दोन हजार नागरिकांची कोरोना चाचणी केली जात आहे. यात ग्रामीण भागात रोज २५० ते ३०० लोकांची चाचणी होत आहे, तर शहरात १७०० ते १८०० नागरिकांच्या तपासण्या केल्या जात आहे. शहरातील पॉझिटिव्हिटी रेट बुधवारी १५.४२ टक्के होता. दिवसभरात २६२ रुग्णांचे शहरात निदान झाले होते. त्याउलट ग्रामीण भागात केवळ १९ रुग्ण आढळले. धक्कादायक म्हणजे ६ फेब्रुवारी रोजी औरंगाबाद शहराचा पॉझिटिव्हिटी रेट केवळ ४.५० टक्के होता. परंतु अवघ्या १८ दिवसांत हा दर १५ टक्क्यांवर गेला आहे.
संपूर्ण कुटुंब पॉझिटिव्हिटीचे प्रमाण अधिक
शहरात सध्या ठरावीक एखाद्याच भागात नव्हे तर बहुतांश भागांत कमीअधिक प्रमाणात रुग्णांचे निदान होत आहे. त्यातही संपूर्ण कुटुंब पॉझिटिव्हिटी आढळण्याचे प्रमाण सध्या अधिक आहे. त्यामुळे विविध कामानिमित्त बाहेर पडणाऱ्यांनी घरी गेल्यानंतर पुरेशी काळजी गरजेचे असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले.
आरोग्य अधिकारी म्हणाले..
जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. सुधाकर शेळके म्हणाले, जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर हा रोज बदलत असतो. मंगळवारी १४.४ टक्के होता, तर बुधवारी १२.३ टक्के होता. महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डाॅ. नीता पाडळकर म्हणाल्या, सध्या विविध भागांत रुग्ण आढळून येत आहे. संपूर्ण कुटुंबाला बाधा झाल्याचे समोर येत आहे. पॉझिटिव्हिटी दर १५ टक्के आहे. नागरिकांनी मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सचे पालन, वारंवार हात धुण्यास प्राधान्य द्यावे.