दुष्टचक्रात औरंगाबादचा पाणीपुरवठा

By Admin | Updated: June 18, 2014 01:37 IST2014-06-18T01:31:54+5:302014-06-18T01:37:05+5:30

औरंगाबाद : औरंगाबाद शहराची तहान वाढत आहे. महावितरण कंपनीचा वीजपुरवठा, महापालिकेच्या जुन्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या दुष्टचक्रात शहराचा पाणीपुरवठा अडकला आहे

Aurangabad water supply in the worst case | दुष्टचक्रात औरंगाबादचा पाणीपुरवठा

दुष्टचक्रात औरंगाबादचा पाणीपुरवठा

औरंगाबाद : औरंगाबाद शहराची तहान वाढत आहे. महावितरण कंपनीचा वीजपुरवठा, महापालिकेच्या जुन्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या दुष्टचक्रात शहराचा पाणीपुरवठा अडकला आहे. समांतर जलवाहिनी पूर्ण होणे आणि सक्षम वीजपुरवठा मिळण्यासह शहरातील वितरण व्यवस्था सुधारण्याची गरज ‘लोकमत’ आयोजित परिसंवादात आज व्यक्त करण्यात आली.
महापालिका आणि महावितरण कंपनीच्या भांडणात दीड महिन्यापासून औरंगाबादकर पाण्यासाठी वणवण भटकत आहेत. दोन्ही संस्था एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करून टोलवाटोलवी करीत आहेत, की सत्य वेगळे आहे. हे जाणून घेण्यासाठी ‘लोकमत’च्या टीमने परिसंवादातून आज पाणीपुरवठ्यातील बारकावे समोर आणण्याचा केलेला हा प्रयत्न.
संकलन : विकास राऊत, प्रशांत तेलवाडकर
या परिसंवादात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सेवानिवृत्त अभियंता एच.आर. ठोलिया यांच्यासह नगरसेवक काशीनाथ कोकाटे, राजू वैद्य, सुरेंद्र कुलकर्णी, बालाजी मुंडे, प्राजक्ता भाले, राजेंद्र दाते, मंगेश भाले, महावितरणचे मुख्य अभियंता शंकर शिंदे, आजीनाथ सोनवणे, मनपाचे कार्यकारी अभियंता हेंमत कोल्हे यांनी सहभाग घेतला.
शहराला जायकवाडी, हर्सूल येथून पाणीपुरवठा होतो. १९७२ साली टाकण्यात आलेल्या ७०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीवर १९९२ पर्यंत पाणीपुरवठा झाला. १९८४ ते १९९२ या दशकामध्ये उद्योगास चालना मिळाल्याने शहर रोजगार निर्मितीक्षम होत गेले. त्यामुळे १९९२ साली महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून १,४०० मि.मी. व्यासाची जलवाहिनी पैठण ते औरंगाबादपर्यंत टाकण्यात आली. या दोन्ही जलवाहिन्यांचे वयोमान आता संपले आहे. शहराच्या लोकसंख्येच्या हिशोबाने दरडोई १३५ लिटरप्रमाणे १७ कोटी ५५ लाख लिटर पाण्याची गरज आहे. या तुलनेत १३ कोटी लिटर पाणी शहराला मनपा पुरवीत आहे. साडेचार कोटी लिटर पाण्याची गरज व भविष्यातील वाढती लोकसंख्या विचारात घेता समांतर जलवाहिनीची योजना तयार करण्यात आली. मात्र, योजना पूर्ण होण्यास तीन ते साडेतीन वर्षांचा कालावधी लागणार आहे. सध्या आहे त्याच जलवाहिन्यांवर औरंगाबादकरांना तहान भागवावी लागणार आहे.
आगामी काही वर्षांमध्ये १३ लाख लोकसंख्येचे हे शहर डीएमआयसीच्या दिशेने झेपावणार आहे. उद्योग आणि लोकसंख्या त्यामुळे वाढणारच आहे.
उद्योग, शिक्षण, पर्यटन, नोकरदार यांच्या उत्पन्नावर हे शहर चालते. सुमारे पावणेदोन लाख रोजगार उद्योगातून, ३० हजार विद्यार्थी शिक्षणासाठी आहेत. दरवर्षी १० लाख पर्यटक शहराला भेट देतात. त्यातील ३ लाख पर्यटक मुक्कामी असतात. निवासी क्षेत्रातील पाणीपुरवठ्यासह पर्यटनाच्या दृष्टीने पाणीपुरवठ्याचे व्यवस्थापन होणे गरजेचे आहे.
नागरिकांची कुचंबणा होतेय
पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास नागरिकांची कुचंबणा होते. पाण्याची निर्माण केलेली समस्या आहे. समांतर जलवाहिनी झाल्यावर पाणी मिळेल, असे गाजर जनतेला दाखविले जात आहे. सिडको-हडकोच्या पाण्यावर दरोडा टाकण्यात येत आहे. बायपास हे राजकीय दबावामुळे टाकण्यात आले आहेत. त्यामुळे सिडको-हडकोला हक्काचे पाणी मिळत नाही. समांतर जलवाहिनी योजना केव्हा होणार याबाबत साशंकता आहे. ४४० एमएलडी पाण्याची गरज २०४२ सालापर्यंत असेल आणि समांतरमधून ३०० एमएलडी पाणी येईल. १४० एमएलडी पाणी पालिका कुठून आणणार, असा प्रश्न आहे. पीपीपीवर ती योजना आहे. योजनेच्या करारातच अनेक त्रुटी आहेत. जलशुद्धीकरण लॅब, जलवाहिन्यांच्या प्रकाराची त्यात माहिती नाही.
राजेंद्र दाते, सामाजिक कार्यकर्ता
वीज व पाण्याचा अतिरिक्त वापर टाळा
विजेचा अपाम वापर होत आहे, तसेच मीटरवरील रीडिंगही व्यवस्थित होत नाही. पाण्याचाही काही ठिकाणी अतिरिक्त वापर केला जात आहे. त्याचा परिणाम पुढील भागात पाणीपुरवठा कमी होतो. जेवढी वीज तुम्ही वापराल तेवढे जास्त बिल तुम्हाला मिळते. यामुळे वीज बचतीच्या बाबतीत ग्राहकांमध्ये जागरूकता येणे आवश्यक आहे. पूर्वी नळाला पाणी येतेतेव्हा वीजपुरवठा चालू असल्याने मोटारींचा वापर वाढला आणि ज्यांच्याकडे मोटारी नाहीत, त्यांच्याकडे पाणी कमी येऊ लागले. त्यावेळी मनपाच्या तत्कालीन महापौर, उपमहापौरांनी सांगितले की, जेव्हा नळाला पाणी येते त्यावेळी वीजपुरवठा खंडित करीत जा. पाणी येते तेव्हा वीज सुरू ठेवली तर पाणी मिळत नाही म्हणून ओरड होते. जेव्हा वीजपुरवठा बंद केला होता, तेव्हा मोटारी सुरू होत नाहीत, असे दोन्ही बाजूने ओरड होत असते.
-आजीनाथ सोनवणे, अधीक्षक अभियंता (ग्रामीण मंडळ)
सिडकोने फसविले
सिडकोच्या निर्मिती वेळी ३ इंच जलवाहिनी देण्याचे ठरले होते. हळूहळू जशी घरे वाढली तशी पाणीपुरवठ्याची मागणी सुरू झाली. दिल्लीगेट येथे पंप बसवून पाणीपुरवठा केला. सिडकोने जनतेची फसवणूक केली आहे. नांदेड, पनवेल, बेलापूर, वाशी या भागामध्ये पाण्याचे स्रोत सिडकोने दिले. मात्र, औरंगाबादेत सिडकोेने पाणीपुरवठ्याची स्वतंत्र व्यवस्था केली नाही. २४ तास पाणीपुरवठा करू, असा सिडकोने शब्द दिला होता. हस्तांतरण करतानाही कुणी त्याबाबत बोलले नाही. एकतर्फी प्रक्रिया पार पडली. एमआयडीसीकडून सिडकोने नागरिकांना पाणी पुरविले; पण येथून जाताना सिडकोने पाण्याचा स्रोत निर्माण केला नाही. छावणीलाही मनपा पाणीपुरवठा करते. तसेच जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंतच्या गावांनाही मनपाला पाणी द्यावे लागते. जीवन प्राधिकरणाने पालिकेला जलवाहिन्यांच्या योजना मोफत हस्तांतरित केल्या आहेत. समांतर जलवाहिनीचे काम ३ वर्षांपासून का रेंगाळले. शासन निधीवर व्याज गोळा करण्यासाठी निधी मिळालेला नाही. विलंबामुळे योजना महागली आहे. त्याचा भुर्दंड कुणावर पडणार.
-एच.आर. ठोलिया, सेवानिवृत्त अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण
मनपाने कर्मचारी वाढवावेत
शहरात पाण्याची भयावह परिस्थिती आहे. मनपाच्या पाणीपुरवठा विभागातील अनेक कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत. ते वाढविण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. मनपा महावितरणवर आणि महावितरण मनपावर ढकलून हात वर करते. मात्र, आम्हाला नागरिकांना तोंड द्यावे लागते. पाणीपुरवठ्याचे सगळे वेळापत्रक कोलमडलेले आहे. मनुष्यबळ कमी असण्याची, बायपास बंद करण्याची मागणी अधिकारी करतात. जलकुंभ पूर्ण भरले जात नाहीत. उन्हाळ्यात त्रास झाला नाही. मात्र, जेव्हा उन्हाळा संपत आला. तेव्हा नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. आभाळ भरून आले तरी अशी भीती वाटते की, उद्या महावितरणचा वीजपुरवठा खंडित होईल आणि पुरवठा विस्कळीत होईल.
-सुरेंद्र कुलकर्णी, नगरसेवक
मनपावर पूर्ण शहराची जबाबदारी
मनपावर सध्या संपूर्ण शहराला पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी आहे. सिडको-हडको आणि शहर असा दुजाभाव पालिकेला करता येत नाही. तसेच उद्योगांना दिलेले पाणीही बंद करता येत नाही. शहराच्या तुलनेत उद्योगांकडून ८ कोटींचा महसूल मिळतो. त्यावर डागडुजीचा खर्च भागतो. महावितरणकडून वारंवार पाणीपुरवठा खंडित होतो आहे. या दोन दिवसांपासून सुरळीत वीजपुरवठा होतो आहे. १ तास वीज गेली तर त्याचे परिणाम चार दिवस होतात. पालिकेचे कर्मचारी पहाटेपर्यंत कार्यरत असतात. अनेक कर्मचाऱ्यांना मधुमेह, उच्चरक्तदाब यासारखे आजार जडले आहेत. काम करण्यात पालिका कुचराई करीत नाही. मात्र, वीजपुरवठ्यावर पाणीपुरवठा अवलंबून आहे. शहरातील वितरण व्यवस्था भौगोलिकदृष्ट्या चढ-उताराची असल्यामुळे जलकुंभ भरण्यात अडचणी येतात.
-हेंमत कोल्हे, कार्यकारी अभियंता, मनपा
महावितरण, मनपात समन्वय नाही
महावितरण कंपनी आणि मनपात समन्वय नसल्यामुळे अलीकडच्या काळात पाणी असतानाही पाणीटंचाई निर्माण होत आहे. महावितरणने वीजपुरवठा खंडित झाल्यास इमर्जन्सी पथक नेमावे. शहराची लोकसंख्या वाढत आहे. २००६ मध्ये समांतर जलवाहिनी १८५ एमएलडी पाण्यासाठी टाकावी. यासाठी सर्व्हे झाला. आता समांतर जलवाहिनीतून ३०० एमएलडी पाण्याची गरज आहे. सिडको-हडकोला स्वतंत्र पाणीपुरवठा योजना मिळाली नाही, हे सत्य आहे. हस्तांतरणानंतर सिडकोला पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी पालिकेवर आली. समांतर होईपर्यंत पाणी वाढणे शक्य नाही. समांतरला किती वर्ष लागणार हे स्पष्ट नाही. आहे त्या जलवाहिन्यांवरच शहराचा पाणीपुरवठा भागवावा लागणार आहे.
काशीनाथ कोकाटे, नगरसेवक
सिडको-हडकोवर मनपाचे प्रयोग
पाणीपुरवठ्याच्या बाबतीत काही बदल करायचे म्हटले की, पालिकेला आधी सिडको- हडकोचा भाग दिसतो. प्रयोग करण्याचा प्रयत्न सिडको- हडकोवरच होतो. दुजाभाव करण्यापेक्षा पालिकेने समान पाणीवाटप केले पाहिजे. उन्हाळ्यात पालिकेला वारंवार निवेदन दिले. मात्र, पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही. पाणी ही दैनंदिन गरज आहे. पाणीपुरवठा सुरू असताना वीजपुरवठा खंडित होतो. अशा वेळी पर्यायी यंत्रणा महाविरतणने उभारणे गरजेचे आहे. एक्स्प्रेस जलवाहिनीवरून ४२ एमएलडी पाणीपुरवठा होतो. तरीही पाणी कमी पडते. सिडको- हडकोसाठी असलेल्या जलकुंभांवर पाण्याचे टँकर भरले जातात. टाक्यांवर मीटर बसविले जावे. जेणेकरून कळेल जलकुंंभात किती पाणी आहे व ते किती भागांना पुरेल.
-प्राजक्ता भाले, नगरसेविका
लोडशेडिंगसह वॉटरशेडिंग
नागरिक सध्या लोडशेडिंगसह वॉटरशेडिंगचा अनुभव घेत आहेत. ३ ते ४ दिवसांनी पाणीपुरवठा होतो आहे. शहरातील ५० टक्के गुंठेवारी वसाहतींना टँकरने पाणीपुरवठा केला जातो. दिवसाआड १ ड्रम पाणी वर्षाला ३ हजार देऊन मिळते. समांतर जलवाहिनी होण्यास अजून ३ वर्षे लागतील, असे बोलले जाते. या काळात गुंठेवारी वसाहतींमधील लोकसंख्या दुप्पट झालेली असेल. त्यांची पाण्याची गरज टँकरवर भागणार नाही. सध्या पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडलेले आहे. त्यामुळे गुंठेवारी भागातील टँकर दुसऱ्या वसाहतींमध्ये पाठविले जातात. परिणामी, गुंठेवारी वसाहतींमध्ये पाणी येत नाही. अनेक वॉर्डांमधील हातपंप आटले आहेत. वीज नाही. पाणी नाही. त्यामुळे लोडशेडिंग आणि वॉटरशेडिंगच्या यातना नागरिकांना भोगाव्या लागत आहेत.
-बालाजी मुंडे, नगरसेवक
जलस्रोत वाढविणे हाच पर्याय
पाणी प्रश्न गंभीर होत चालला आहे. त्यावर उपाय म्हणजे शहरात जलस्रोत वाढविणे हा होय. त्यासाठी मनपा, राज्य व केंद्र शासनात समन्वय होऊन हर्सूलला तलावाला धरणात रूपांतरित करावे लागेल. महावितरण आणि मनपात समन्वय नाही. मनपाचे इन्फ्रास्ट्रक्चर ४० वर्षे जुने आहे. तर महावितरणचे इन्फ्रास्ट्रक्चर देखील जुने होत आहे. कमी दाबाने पाणीपुरवठा झाला तर जलकुंभ भरत नाहीत. त्यावर उपाय म्हणून समांतर जलवाहिनीचा पर्याय पुढे आला. तो प्रकल्प शेवटच्या टप्प्यात आहे. अ‍ॅप्रोच चॅनलचे कामही पूर्ण केले. समाधानकारक पाणीपुरवठा होत नसल्यामुळे मनपा, महावितरणवर आरोप होत आहेत. दोन्ही संस्थांची यंत्रणा २४ तास कार्यरत असते. मात्र, मनपाच्या इन्फ्रास्ट्रक्चरमुळे काही अडचणी येतात. तशाच महावितरणमुळेही येतात. त्यासाठी जायकवाडीसह आणखी दोन स्रोत तयार करावेच लागतील.
राजू वैद्य, नगरसेवक

Web Title: Aurangabad water supply in the worst case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.