औरंगाबादच्या विद्यार्थ्यांना मिळाले मानाचे स्थान
By Admin | Updated: December 23, 2015 00:06 IST2015-12-22T23:36:45+5:302015-12-23T00:06:53+5:30
औरंगाबाद :प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम पाहण्याचा मान आपल्या शहरातील खंडेराव हरिभाऊ काळे आणि अक्षय अनंत कोलते या दोन विद्यार्थ्यांना मिळाला आहे.

औरंगाबादच्या विद्यार्थ्यांना मिळाले मानाचे स्थान
औरंगाबाद : २६ जानेवारी रोजी होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात दिल्लीला पंतप्रधान कक्षात बसून ‘याचि देही याची डोळा’ प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम पाहण्याचा मान आपल्या शहरातील खंडेराव हरिभाऊ काळे आणि अक्षय अनंत कोलते या दोन विद्यार्थ्यांना मिळाला आहे. हा कार्यक्रम एकदा तरी प्रत्यक्ष अनुभवायला मिळावा, असे स्वप्न अनेक भारतवासीय पाहत असतात.
दरवर्षी देशातील विविध क्षेत्रातील गुणवंतांना या कार्यक्रमासाठी पाचारण करण्यात येत असते. यंदा या कार्यक्रमासाठी गुणवंत विद्यार्थ्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून देशभरातील विविध राज्यांमधून जवळपास ३०० विद्यार्थ्यांचा बायोडाटा मागवण्यात आला होता. खंडेराव काळे हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठातील राज्यशास्त्राचा विद्यार्थी आहे. विद्यापीठाच्या सल्लागार समितीमध्ये देखील त्याचा सक्रिय सहभाग आहे. अक्षय कोलते हा औरंगाबादच्या जवाहरलाल नेहरू अभियांत्रिकी महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. तो इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिक म्युनिकेशन शाखेच्या अंतिम वर्षाला आहे. पुण्याच्या ‘मैत्री’ या सेवाभावी संस्थेसोबत तो मेळघाटातील आदिवासी लोकांसाठी कार्य करत असतो. तसेच ‘वेस्टपासून बेस्ट’ बनवण्याच्या कार्यातही त्याचा सक्रिय सहभाग आहे. डॉ. बा. आं. म. वि. चे कुलगुरू डॉ. चोपडे, कुलसचिव डॉ. राजेश करपे, डॉ. पुरुषोत्तम देशमुख आदींनी या दोन्ही विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.