कमी टक्क्यांच्या केंद्रांवर लक्ष
By Admin | Updated: September 14, 2014 00:22 IST2014-09-14T00:06:33+5:302014-09-14T00:22:14+5:30
औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील जनजागृती विभागाने कंबर कसली आहे.

कमी टक्क्यांच्या केंद्रांवर लक्ष
औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील जनजागृती विभागाने कंबर कसली आहे. लोकसभा निवडणुकीत पन्नास टक्क्यांपेक्षा कमी मतदान झालेल्या जिल्ह्यातील १२७ मतदान केंद्रांवर या विभागाने लक्ष केंद्रित केले आहे. या केंद्रांवर जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी संबंधित ठिकाणी ग्रामसभा आणि वॉर्ड बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे.
राज्यातील सर्वच विधानसभा मतदारसंघांत जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी आयोगाकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी मतदारांत जागृती निर्माण करण्यासाठी प्रत्येक जिल्हास्तरावर स्वीप सेलची स्थापना करण्यात आली आहे.
औरंगाबादेत स्वीप सेलची धुरा जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीत पन्नास टक्क्यांपेक्षा कमी मतदान झालेल्या मतदान केंद्रांवर यावेळी मतदानाचा टक्का वाढविण्याचा या सेलचा प्रयत्न आहे.
त्यासाठी विधानसभा मतदारसंघनिहाय अशा मतदान केंद्रांची यादी तयार करून तेथे ग्रामीण भागात ग्रामसभा आणि शहरात वॉर्ड बैठका घेण्याचा निर्णय घेतला आहे.
लोकसभा निवडणुकीत पन्नास टक्क्यांपेक्षा कमी मतदान झालेल्या केंद्रांमध्ये सर्वाधिक ३३ मतदान केंद्रे ही वैजापूर विधानसभा मतदारसंघात आहेत, तर सर्वात कमी मतदान झालेले १ मतदान केंद्र हे सिल्लोड मतदारसंघात आहे. लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील ९ तालुक्यांमध्ये २६३० मतदान केंद्रे होती. त्यापैकी १२७ मतदान केंद्रांवर पन्नास टक्क्यांपेक्षा कमी मतदान झालेले आहे. या सर्व मतदान केंद्रांवर यावेळी निश्चितपणे शंभर टक्के मतदान करण्याचा प्रयत्न असल्याचे वासुदेव सोळंके यांनी सांगितले.