हंगामी वसतिगृहांची हजेरी ‘कागदा’वरच!
By Admin | Updated: December 8, 2015 00:07 IST2015-12-07T23:42:48+5:302015-12-08T00:07:41+5:30
संजय तिपाले , बीड हंगामी वसतिगृहांमधील बोगसगिरीला आळा बसावा यासाठी लाभार्थ्यांच्या नोंदी बायोमेट्रिक यंत्राद्वारे घेण्याचे आदेश शिक्षण विभागाने काढले;

हंगामी वसतिगृहांची हजेरी ‘कागदा’वरच!
संजय तिपाले , बीड
हंगामी वसतिगृहांमधील बोगसगिरीला आळा बसावा यासाठी लाभार्थ्यांच्या नोंदी बायोमेट्रिक यंत्राद्वारे घेण्याचे आदेश शिक्षण विभागाने काढले;परंतु वसतिगृहे सुरु होऊन सव्वा महिन्यांचा कालावधी उलटूनही विद्यार्थी उपस्थितीच्या नोंदी रजिस्टरमध्येच घेणे सुरु आहे. त्यामुळे पारदर्शकर्तेवर प्रश्नचिन्ह कायम आहे.
१ आॅक्टोबर ते ३१ मार्च या सहा महिन्यांच्या कालावधीत ऊसतोड कामगार रोजगारासाठी स्थलांतर करतात. त्यांच्या पाल्यांच्या शिक्षणाची अबाळ होऊ नये, यासाठी सर्व शिक्षा अभियानांतर्गत हंगामी वसतिगृृहे चालविली जातात. यावर्षी शासनाने विद्यार्थ्यांना वसतिगृहात राहण्याची अट शिथिल केली आहे. नातेवाईकांकडे राहून केवळ जेवण व इतर सुविधा घेण्यासाठी वसतिगृहांचा आधार घ्यावा, असे अपेक्षित आहे. एका विद्यार्थ्यावर सहा महिन्यांत तब्बल ८ हजार २०० रुपये खर्चाची तरतूद आहे.
आराखड्यात २५ हजार ६०० इतक्या विद्यार्थ्यांसाठी २० कोटी ९२ लाख रुपयांचा निधी मंजूर आहे. मात्र, अद्याप ना विद्यार्थ्यांसाठीचे अनुदान आले ना उपस्थितीची नोंद घेण्यासाठी खरेदी करावयाच्या बायोमेट्रिक यंत्रासाठी! एका यंत्रासाठी अडीच हजार रुपयांचा खर्च होऊ शकतो. जिल्ह्यात ५४३ वसतिगृहे सुरु असून त्यासाठी १३ लाख ५७ हजार ५०० रुपये इतक्या निधीची आवश्यकता आहे.
हंगामी वसितगृहात पहिली ते आठवीपर्यंतची मुले राहू शकतात. गतवर्षी २३ हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी वसतिगृहांचा आश्रय घेतला होता. यंदा या आकड्यात ९ हजार विद्यार्थी वाढले आहेत.
४३२ हजार ८४६ विद्यार्थी हंगामी वसतिगृहात असल्याची नोंद सर्व शिक्षा अभियानच्या दफ्तरी आहे. दुष्काळी स्थिती असल्याने स्थलांतर वाढले असून परिणामी विद्यार्थीसंख्याही वाढल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.