निवडणुकीचे वातावरण थंडच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2016 01:15 IST2016-10-15T00:59:10+5:302016-10-15T01:15:32+5:30
हिंगोली : नगरपालिका निवडणुकीचा बिगूल कधीही वाजू शकतो. त्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचाली गतिमान होेणे अपेक्षित असताना वातावरण अचानकच थंड झाले आहे.

निवडणुकीचे वातावरण थंडच
हिंगोली : नगरपालिका निवडणुकीचा बिगूल कधीही वाजू शकतो. त्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचाली गतिमान होेणे अपेक्षित असताना वातावरण अचानकच थंड झाले आहे. पक्षीय बैठकांमध्येही काही दम उरला नाही. ना कुठे कार्यकर्त्यांचा लवाजमा ना तयारीसाठी नेतेमंडळींची लगबग. काहींचे तर नगराध्यक्षपदाचे उमेदवारही अजून बिळाबाहेर निघाले नाहीत.
हिंगोली नगरपालिकेचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी असल्याने राजकीय महत्त्वाकांक्षा बाळगणाऱ्या प्रत्येकाला पक्षीय नव्हे, तर अपक्ष म्हणून का होईना रिंगणात उतरण्याची संधी आहे. प्रमुख राजकीय पक्षांचीच प्रभागातील जोडी जुळविण्यातच दमछाक होत आहे. तसेही हिंगोली पालिकेत पक्षीय बलाबलात यापूर्वी तरीही राष्ट्रवादी वगळता इतर कुणाचाही दुहेरी आकडा नाही. आता सर्वांनाच दुहेरी आकडा गाठण्याची आस आहे. त्यासाठी उमेदवार शोधण्यासाठी कवायती सुरू आहेत. उमेदवारही चलाखी करीत आहेत. सकाळी एका तर रात्री दुसऱ्या तंबूत जागरण करीत फिरत आहेत. त्यामुळे निवडणुकीचा अर्ज भरून एबी फॉर्म कुणाचा स्वीकारला हे प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिल्याशिवाय अशांचा भरवसा श्रेष्ठींनाही पटणार नाही, अशी गत आहे. एवढे वातावरण गढूळ झालेले असताना काँग्रेस व भाजप या राष्ट्रीय पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे, हेही तेवढेच खरे. सत्ताधारी म्हणून राष्ट्रवादीसमोर प्रतिष्ठा राखण्याचे आव्हान आधीपासूनच आहे. अधिक वेगवान घडामोडी आचारसंहिता लागल्यानंतर पहायला मिळतील, असे दिसते. त्यामुळे वादळापूर्वीची ही शांतता असल्यासारखे चित्र आहे. आता राकाँ-१५, शिवसेना-५, मनसे-३, काँग्रेस-३, भाजप-२ असे चित्र आहे. प्रयत्न तर सर्वच करत आहेत. मात्र त्यात कोणाचे बळ वाढते व कोणाचे कमी होणार? हे काळच सांगेल. (जिल्हा प्रतिनिधी)