सहायक निरीक्षकाने कानशिलावर पिस्तूल लावून तिघांना बदडले
By Admin | Updated: February 8, 2016 00:23 IST2016-02-07T23:44:26+5:302016-02-08T00:23:49+5:30
चौसाळा : जमिनीच्या वादातून बीड तालुक्यातील धोत्रा शिवारात औरंगाबाद ग्रामीण ठाण्यातील सहायक निरीक्षकाने तिघांना बेदम मारहाण केली.

सहायक निरीक्षकाने कानशिलावर पिस्तूल लावून तिघांना बदडले
चौसाळा : जमिनीच्या वादातून बीड तालुक्यातील धोत्रा शिवारात औरंगाबाद ग्रामीण ठाण्यातील सहायक निरीक्षकाने तिघांना बेदम मारहाण केली. यावेळी पिस्तूलची मूठ मारून एकाचे डोके फोडले. ही घटना रविवारी सायंकाळी घडली. जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
फुलचंद कल्याण चव्हाण, महादेव कल्याण चव्हाण, धनराज कल्याण चव्हाण (सर्व रा. धोत्रा, ता. बीड) अशी जखमींची नावे आहेत. औरंगाबाद ग्रामीण ठाणे हद्दीत कार्यरत सहायक निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांचा चव्हाण यांच्यासोबत जमीन खरेदी-विक्रीचा व्यवहार झाला होता. यापैकी तीन गुंठे जमीन चौपदरीकरणात गेली आहे. जमिनीच्या मालकी हक्कावरून चव्हाण बंधू व कोकणे यांच्यात वाद होता. रविवारी कोकणे हे धोत्र्यात आले. बाचाबाचीचे पर्यावसन हाणामारीत झाले. कोकणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तिघा भावांना लाठ्याकाठ्याने मारहाण केली. कोकणे यांनी त्यांच्याकडील पिस्तूल काढून एकाच्या कानशिलावर ठेवले व त्याची मूठ मारून त्याला जखमी केले. घटनेनंतर ते सर्व पळून गेले. महादेव यांची प्रकृती गंभीर आहे. नेकनूर ठाण्याचे पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. ठाण्यात नोंद झाली नव्हती. (वार्ताहर)