सेनेने दिला मनपा आयुक्तांना धीर

By Admin | Updated: January 4, 2015 01:15 IST2015-01-04T01:10:30+5:302015-01-04T01:15:27+5:30

औरंगाबाद : महापालिका आयुक्त आणि भाजपाचे गटनेते संजय केणेकर यांच्यातील वादात शिवसेनेकडून आयुक्तांना धीर देण्यात आल्याचे वृत्त आहे.

The army has given the army the courage | सेनेने दिला मनपा आयुक्तांना धीर

सेनेने दिला मनपा आयुक्तांना धीर

औरंगाबाद : महापालिका आयुक्त आणि भाजपाचे गटनेते संजय केणेकर यांच्यातील वादात शिवसेनेकडून आयुक्तांना धीर देण्यात आल्याचे वृत्त आहे. भाजपाकडून झालेल्या आरोप-प्रत्यारोपांचे राजकीय भांडवल करण्यास शिवसेना सरसावली असून, महापौर कला ओझा यांच्या दालनात झालेल्या बैठकीला आज भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना दूर ठेवण्यात आले.
आयुक्तांप्रती सहानुभूती दाखवून त्या मोबदल्यात शिवसेना नगरसेवकांच्या वॉर्डातील कामे मंजूर करून घेता येतील, अशी सेनेची भूमिका असल्याचे समजते. धमकी प्रकरणात भाजपाला एकटे पाडण्याचा डाव सेनेने आखल्याची चर्चा आता रंगते आहे. समांतर जलवाहिनी प्रकरणात शिवसेना बॅकफूटवर आली आहे. आगामी निवडणुका लक्षात घेऊन शिवसेना आणि भाजपामध्ये अंतर्गत संघर्ष सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सेनेने आयुक्तांची बाजू घेतली आहे.
भाजपाने आक्रमकपणे विरोध सुरू केल्यामुळे सेनेने आयुक्त धमकी प्रकरणात त्यांची सहानुभूती मिळविण्यासाठी डावपेच आखले आहेत. त्यामुळेच आज सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केल्यानंतर महापौरांच्या दालनात अचानक विकासकामे, अतिक्रमण आढाव्याची बैठक घेण्यात आली. बैठकीला सभापती विजय वाघचौरे, विरोधी पक्षनेते रावसाहेब गायकवाड, काँग्रेसचे गटनेते मीर हिदायत अली, अनिल जैस्वाल यांची उपस्थिती होती.
भाजपाचा एक नगरसेवक बैठकीला उशिरा पोहोचला होता. दरम्यान, उपमहापौर संजय जोशी म्हणाले की, महापौरांच्या दालनातील बैठकीचा निरोप आला नाही.
महापौर कला ओझा म्हणाल्या की, बैठक वगैरे घेतली नाही. अभिवादनाच्या कार्यक्रमानंतर आयुक्त महाजन यांना दालनात बोलावले होते. त्यांना शुक्रवारच्या घटनेप्रकरणी विचारले. धमकी दिली नसल्याचे त्यांनी स्पष्टीकरण दिले. शेवटी ते (केणेकर यांचे नाव न घेता) पदाधिकारी आहेत. त्यांच्याबाबतीत असा प्रकार घडू नये. म्हणून सर्व घटनेचा आढावा घेतला.
...तर आयुक्तांच्या विरोधात आंदोलन
पालिका आयुक्त प्रकाश महाजन यांनी कामगार, कर्मचाऱ्यांबाबत वर्तन सुधारावे; अन्यथा ‘आयुक्त चले जाव’ आंदोलन करण्यात येईल, असा इशारा कामगार शक्ती संघटनेचे संस्थापक गौतम खरात यांनी दिला आहे. २००९ पासून पालिका महागाई भत्ता देण्यास टाळाटाळ करीत आहे. सुट्यांचा मोबदला देत नाही. थकबाकी देण्याचे ठरलेले असताना मिळत नसेल, तर कामगारांना आंदोलन करावेच लागेल.
भाजपाची दानवेंकडे तक्रार
आयुक्त प्रकाश महाजन आणि भाजपचे गटनेते संजय केणेकर यांच्यात शुक्रवारी झालेल्या वादाचे आणि आयुक्तांनी केणेकर यांना धमकावल्याचे प्रकरण केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यापर्यंत गेले आहे. दानवे हे आयुक्तांना बोलावून त्या प्रकरणाची माहिती घेणार असल्याचे उपमहापौर संजय जोशी यांनी सांगितले.
शनिवारी सकाळी केणेकर आणि जोशी यांनी विमानतळावर दानवे यांची भेट घेऊन सर्व प्रकार कथन केला. दानवे यांनी त्या दोघांना सांगितले की, मी सध्या दौऱ्यावर आहे. दोन दिवसांनी या प्रकरणी आयुक्तांना बोलावून घेऊ. या प्रकरणामुळे आता आयुक्तांच्या बदलीसाठी भाजपा सक्रिय झाली आहे; परंतु सध्या येथे येण्यास कुणीही तयार नसल्याची परिस्थिती आहे. दरम्यान, भाजपा पदाधिकाऱ्यांनी आज आयुक्तांची भेट घेऊन विकासकामे करण्याची मागणी केली. पैसे नसल्यामुळे विकासकामे होणे शक्य नाही, अशी प्रशासनाची भूमिका आहे. आगामी चार ते पाच महिन्यांत कंत्राटदारांची रक्कम देणे शक्य आहे. त्यामुळे पालिकेने त्या अनुषंगाने विचार करावा, अशी सूचना पदाधिकाऱ्यांनी केली.
विकासकामे कशी करणार
विकासकामे करणे, कर्मचाऱ्यांचा महागाईभत्ता देणे, सुट्यांचा मोबदला देणे, कंत्राटदारांची बिले देण्यासाठी पालिकेला अवघड झाले आहे. कर्मचाऱ्यांना भत्ता व सुट्यांच्या मोबदला यासाठी १० कोटी रुपये दिले, तर विकासकामे होणार नाहीत, अशी पालिकेची अवस्था आहे. यामुळे आयुक्तांसह सर्वाधिकारी हैराण झाले आहेत.
‘त्या’ प्राध्यापकाचा पुन्हा गोंधळ
औरंगाबाद : ‘थर्टीफर्स्ट’ साजरा करण्यासाठी वसतिगृहातून विद्यार्थिनीला बाहेर नेण्यास अपयशी ठरलेल्या प्राध्यापकाच्या रागाचा पारा उतरायचे नाव घेत नाही. आज शनिवारी पुन्हा ‘त्या’ प्राध्यापकाने विद्यार्थी कल्याण विभागाच्या संचालकांना कार्यालयात जाऊन अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करीत धमक्या दिल्या.
यासंदर्भात सदर प्रतिनिधीने कुलसचिव डॉ. धनराज माने यांना वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. दुपारी झालेल्या घटनेमुळे हादरलेल्या विद्यार्थी कल्याण विभागाच्या संचालक डॉ. चेतना सोनकांबळे यांनी कुलसचिव डॉ. माने यांची भेट घेऊन घडलेला प्रकार सांगितला. कुलगुरू आल्यानंतर ‘त्या’ प्राध्यापकाविरुद्ध निर्णय घेतला जाईल. तत्पूर्वी, विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने त्यास नोटीस बजावली जाईल, अशी भूमिका कुलसचिवांनी घेतली.
‘ते’ प्राध्यापक, ‘ती’ विद्यार्थिनी व तिच्या नातेवाईकांनी विद्यापीठात जाऊन संचालकांना शिवीगाळ केली. या प्रकारामुळे डॉ. सोनकांबळे हादरून गेल्या आहेत.
 

 

Web Title: The army has given the army the courage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.