आणखी १०० कोटी देण्याचे संकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2017 00:20 IST2017-08-31T00:20:56+5:302017-08-31T00:20:56+5:30
निधीत चांगली कामे झाल्यास आणखी १०० कोटींचा निधी देण्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले.

आणखी १०० कोटी देण्याचे संकेत
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : महाराष्टÑ शासनाने शहरातील रस्त्यांसाठी १०० कोटींचा निधी मंजूर केला आहे. हा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात येत असल्याच्या हालचाली सुरू होताच मनपातील पदाधिकाºयांनी मंगळवारी मुंबई गाठली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना १०० कोटी मनपालाच द्या असा आग्रह धरण्यात आला. या निधीत चांगली कामे झाल्यास आणखी १०० कोटींचा निधी देण्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले.
शासनाने दिलेल्या १०० कोटींवरून शहरात जोरदार राजकारण सुरू झाले आहे. मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत तक्रारी सुरू झाल्या आहेत. त्यामुळे शासनाने हा निधी थेट सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्याच्या हालचाली सुरू केल्या. याची कुणकुण लागताच महापौर बापू घडामोडे, स्थायी समितीचे सभापती गजानन बारवाल यांनी तातडीने मुंबई गाठली. मनपाचे पदाधिकारी थेट मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी दाखल झाले. मुंबईत संततधार पाऊस सुरू असल्याने मुख्यमंत्रीही निवांत होते. १०० कोटीतील रस्त्यांवर यावेळी सखोल चर्चा झाली. मनपा पदाधिकाºयांनी निधी मनपालाच द्यावा, अशी विनंती केली. मुख्यमंत्र्यांनी ही विनंती मान्य केली. या निधीतून चांगली कामे करा असा सल्ला त्यांनी दिला. ही कामे झाल्यावर आणखी १०० कोटींचा निधी देण्याचे संकेतही त्यांनी चर्चेत दिले.
प्रस्ताव सादर
विभागीय आपत्ती व्यवस्थापन केंद्राचा शंभर कोटी रुपयांचा प्रस्ताव मनपा पदाधिकाºयांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केला. लवकरात लवकर निधी देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती स्थायी समिती सभापती गजानन बारवाल यांनी दिली. औरंगाबाद शहरात आपत्ती व्यवस्थापन केंद्र सुरू करण्याचा निर्णय तत्कालीन आघाडी सरकारने घेतला होता. त्यानुसार करोडी शिवारात जमीनदेखील देण्यात आली आहे. महापालिकेने त्यासाठी डीपीआर (सविस्तर प्रकल्प अहवाल) तयार केला असून, शंभर कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. मुंबईत घडामोडे, बारवाल व माजी महापौर भागवत कराड यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आपत्ती व्यवस्थापन केंद्राचा प्रस्ताव व डीपीआर सादर केला.