अंगणवाड्यांची दैना,कोणी लक्ष देईना!
By Admin | Updated: June 7, 2014 00:25 IST2014-06-06T23:52:41+5:302014-06-07T00:25:19+5:30
कुंभारपिंपळगाव : येथून जवळच असलेल्या राजाटाकळी (ता.घनसावंगी) येथील अंगणवाड्यांची दुरवस्था झाली असून ग्रामपंचायत,
अंगणवाड्यांची दैना,कोणी लक्ष देईना!
कुंभारपिंपळगाव : येथून जवळच असलेल्या राजाटाकळी (ता.घनसावंगी) येथील अंगणवाड्यांची दुरवस्था झाली असून ग्रामपंचायत, पालकवर्ग आणि अधिकारी यापैकी कुणीच लक्ष देत नसल्याने अंगणवाड्यातील बच्चे कंपनी सैरभैर झाली आहे.
सदरील अंगणवाड्यांना खोल्या नाहीत. पोषण आहार निकृष्ठ दर्जाचा दिला जातो. त्यामुळे फूड पॉयझनच्या भीतीने पालकही लेकरांना अंगणवाड्यांत पाठवायचे टाळत आहेत. येथे ५ अंगणवाड्या आहेत. ४ हजार ५०० लोकवस्ती असलेल्या या गावात अंगणवाड्यात जवळपास सरासरी ३०० बालकांची दप्तरी नोंद आहे. परंतु गैरसोयीमुळे प्रत्येक अंगणवाडीत दहा-पाच लेकर येतात. १ अंगणवाडी गावापासून ३ कि.मी. अंतरावर आहे. बालके गावात तर अंगणवाडी शेतात अशी अवस्था आहे. एका अंगणवाडीची खोली पडायला झाली आहे. त्यामुळे लहानगे मुल रस्त्यावरच गलिच्छ जागेत आहार घेतात. २ अंगणवाड्या ग्रामपंचायतीच्या कार्यालयाच्या शेजारीच भरतात.
यासंदर्भात बालविकास प्रकल्प अधिकारी सुनंदा झरे आणि क्षेत्रीय अधिकारी सुनंदा जोशी यांच्याशी संपर्क साधला असता त्या एकमेकांवर जबाबदारी ढकलत आहेत. याबाबत त्यांना अधिक बोलते केले असता त्यांनी ग्रामपंचायत ठराव घेत नसल्याचे सांगितले. या अंगणवाड्यातील बालकांना शुध्द पाणी पुरवठा व्हावा, आजारी बालकांना औषधी व इतर साहित्य पुरविण्यासाठी खात्यावर २८ हजार रुपये ३ महिन्यांपासून येवून पडलेले आहेत. परंतु हा निधी का उचलला जात नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. ग्रामसेवक आणि प्रकल्प अधिकाऱ्यांमध्ये तू-तू, मै-मै होत असल्याने अंगणवाड्यांची वाट लागत असून अंगणवाड्यातील मुले उघड्यावर आले आहेत.
शासनाच्या या योजनेची चांगल्या पध्दतीने अंमलबजावणी होत नसल्याने गावात नाराजीचे सूर उमटत आहेत. शासनाने ही योजना बालकांच्या हितासाठी सुरु केलेली असून बालकांचे पोषण आहारातून आरोग्य सुधारावे, हा उद्देश आहे. शासन अंगणवाड्यांसाठी ग्रामपातळीवरही लाखो रुपये खर्च करत असूनही योजना राबविण्याबाबत कुचराई होत असल्याने बालकांचे कुपोषण वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यासंदर्भात वरिष्ठ पातलीवरुन चौकशी होऊन दोषींवर कार्यवाही करण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)
ग्रामपंचायतचे दुर्लक्ष
राजाटाकळी येथील अंगणवाड्यांची दुरवस्था पाहता ग्रामपंचायतीने वेळीच पाऊले उचलण्याची गरज आहे. अंगणवाड्यांसाठी आलेला २८ हजार रुपयांचा निधी अद्याप अखर्चित राहिल्यामुळे ग्रामपंचायतचे या दुरवस्थेकडे साफ दुर्लक्ष असल्याचे स्पष्ट होत आहे. पोषण आहार, औषधी व खोल्यांच्या दुरुस्तीकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी पालकवर्गातून होत आहे.