दीड लाख हेक्टर्सवर नांगर !
By Admin | Updated: July 30, 2015 00:45 IST2015-07-30T00:32:33+5:302015-07-30T00:45:26+5:30
लातूर : यंदा पेरणी झाल्यानंतर पावसाने ताण दिला आहे. तब्बल पाच आठवड्यांपासून पाऊस झालाच नाही. त्यामुळे पेरणी वाया गेली असून, पेरणी झालेल्या

दीड लाख हेक्टर्सवर नांगर !
लातूर : यंदा पेरणी झाल्यानंतर पावसाने ताण दिला आहे. तब्बल पाच आठवड्यांपासून पाऊस झालाच नाही. त्यामुळे पेरणी वाया गेली असून, पेरणी झालेल्या दीड लाख हेक्टर्सवर शेतकऱ्यांनी नांगर फिरविला आहे. तर २ लाख ५१५ हेक्टर्सवरील पिके करपून गेली आहेत. किमान पीकविमा तरी मिळेल म्हणून हे क्षेत्र शेतकऱ्यांनी मोडीत काढले नाही.
लातूर जिल्ह्यात ५ लाख ५६ हजार ८६० हेक्टर्स खरीपाचे क्षेत्र आहे. यापैकी ३ लाख ५८ हजार ५१५ हेक्टर्सवर पेरणी झाली आहे. या पेरण्यांचे प्रमाण ६४.४ टक्के आहे. सर्वाधिक सोयाबीनचा पेरा २ लाख ३६ हजार ९८७ हेक्टर्सवर झाला आहे. मात्र गेल्या पाच आठवड्यांपासून पाऊस झाला नाही. मृग नक्षत्र वगळता नंतर पाऊसच नाही. पावसाअभावी पिके करपली आहेत. चांगल्या जमिनीवरील पिकांनी तग धरली होती. परंतु, पावसाचा पत्ताच नाही. त्यामुळे ती पिकेही करपली आहेत. त्यामुळे पिके मोडण्याचे प्रमाण वाढले आहे. आतापर्यंत १ लाख ५० हजार हेक्टर्सवरील पिके मोडीत काढण्यात आली आहेत. त्यामध्ये सोयाबीन-४७ हजार ६८३, तूर-४०३१, सूर्यफुल-२०००, मका-३८०, बाजरी-२०० आदी १ लाख ५० हजार हेक्टर्सवरील पिके मोडीत काढली आहेत. लातूर तालुक्यात सोयाबीन १९०२, तूर २०१०, औसा तालुक्यात तूर ७००, सूर्यफुल ७००, मका ३८०, बाजारी २००, निलंगा तालुक्यात सोयाबीन ३०००, तूर ३२७, शिरूर अनंतपाळ तालुक्यात सोयाबीन २२५०, रेणापूर तालुक्यात ३२५०, तूर ४५०, चाकूर तालुक्यात सोयाबीन ९५००, तूर २६६४ असे एकूण जिल्ह्यात १ लाख ५० हजार हेक्टर्सवरील पिके मोडीत काढली आहेत. अन्य २ लाख ५१५ हेक्टर्सवरील पिके करपली आहेत. परंतु, पीकविम्यासाठी शेतकऱ्यांनीते मोडीत काढले नाही.
उदगीर, देवणी, जळकोट, अहमदपूर या तालुक्यांत मात्र पीक मोडीत काढण्याचे प्रमाण थोडे कमी आहे. या तालुक्यात पेरणीनंतर हलकासा पाऊस झाला होता. त्यामुळे पिकांनी तग धरली आहे. देवणी, उदगीर व जळकोट तालुक्यात गेल्या शुक्रवारी रिमझिम पाऊस झाला होता. या पावसामुळे पिकांनी तग धरली आहे. (प्रतिनिधी)