अंबड मत्स्योदरी देवी यात्रोत्सवाची तयारी
By Admin | Updated: September 25, 2014 00:52 IST2014-09-25T00:34:01+5:302014-09-25T00:52:38+5:30
अंबड: जिल्ह्याचे आराध्य दैवत असलेल्या मत्स्योदरी देवी शारदीय नवरात्र महोत्सवाची प्रशासकीय तयारी पूर्ण करण्यात आली आहे. २५ सप्टेंबर ते ३ आॅक्टोबर दरम्यान चालणाऱ्या

अंबड मत्स्योदरी देवी यात्रोत्सवाची तयारी
अंबड: जिल्ह्याचे आराध्य दैवत असलेल्या मत्स्योदरी देवी शारदीय नवरात्र महोत्सवाची प्रशासकीय तयारी पूर्ण करण्यात आली आहे. २५ सप्टेंबर ते ३ आॅक्टोबर दरम्यान चालणाऱ्या नवरात्र महोत्सवासाठी मंदिर परिसराची रंगरंगोटी, विद्युत रोषणाई, स्वच्छता आदी बाबींची पुर्तता करण्यात आली आहे. नवरात्र महोत्सवावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या सहाय्याने लक्ष ठेवण्यात येणार असल्याची माहिती संस्थानचे अध्यक्ष तहसीलदार महेश सावंत यांनी दिली.
श्री महालक्ष्मी, श्री महाकाली व श्री महासरस्वती हे तीनही शक्तीपीठ एकाच ठिकाणी असणारे अंबड हे एकमेव ठिकाण आहे. तीन्ही शक्तीपीठे एकाच ठिकाणी अस्तित्वात असल्याने या परिसराचे स्थान महात्म्य मोठे आहे. तब्बल २ हजार वर्षांपूर्वीच्या स्कंदपुराणामध्ये मत्स्योदरी देवी नवरात्र महोत्सवाचा उल्लेख सापडतो. नवरात्र काळात मत्स्योदरी मातेच्या दर्शनासाठी जालना जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यातून येणाऱ्या भक्तांची मोठी गर्दी होते. यावर्षी २५ सप्टेंबर गुरुवार अश्विन शु.१ शके १९३६ पासुन नवरात्र महोत्सवास प्रारंभ होत आहे. नवरात्र महोत्सवाच्या पहिल्या माळेला २५ सप्टेंबर रोजी संस्थानचे अध्यक्ष तहसिलदार महेश सावंत यांच्या हस्ते सकाळी ११ वाजता घटस्थापना त्यानंतर अभिषेक व व्रणी आदी विधी पार पडतील. २६ सप्टेंबर ते ३ आॅक्टोबर या काळात दररोज नित्याभिषेक, सप्तशतीपाठ, भवानी सहस्त्रनाम, गणपती अथवेशीर्ष, गुरुचरित्र, श्री सुक्त, जप, दररोज देवी महात्म्य व मत्स्योदरी देवी महात्म्य, १ आॅक्टोबर रोजी सातवीमाळ आहे. यात्रेचा मुख्य दिवस आहे. या दिवशी सायंकाळच्या आरतीनंतर प्रतिवर्षीप्रमाणे आतषबाजी करण्यात येईल. २ आॅक्टोबर रोजी रात्री १२ वाजता होमहवनास सुरुवात होईल. ३ आॅक्टोबर दसरा रोजी पहाटे ६ वाजता पुर्णाहुती, ब्राम्हण संभावना, सायंकाळी ५ वाजता नवीन तहसील इमारतीपासुन जुने तहसील इमारत मार्गे मत्स्योदरी देवी मंदीर सीमोल्लघंन होऊन शमीपूजन करण्यात येईल. ८ आॅक्टोबर कोजागिरी पोर्णिमेनिमित्त देवीची दर्शन यात्रा संपन्न होईल. १२ आॅक्टोबर रोजी प्रक्षळ पूजा व दुपारी १ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. नवरात्र काळात दररोज दुपारी १२ व सायंकाळी ७ वाजता आरती तसेच दररोज सकाळी ७ ते ७.३० पर्यंत स्वाध्याय होणार आहे. यात्रेचा जास्तीस जास्त भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन संस्थानचे अध्यक्ष तहसीलदार महेश सावंत, सचिव नायब तहसिलदार पी. बी. मते, संस्थानचे विश्वस्त दत्तात्रय जोशी, बाळासाहेब देशमुख, वसंतराव बल्लाळ, राजेश्वराव देशमुख, बाबासाहेब कटारे आदींनी केले आहे. (वार्ताहर)