आम आदमीला आमरसाचा दिलासा
By Admin | Updated: May 25, 2014 01:10 IST2014-05-25T00:52:00+5:302014-05-25T01:10:31+5:30
त्र्यंबक वडसकर, परभणी उन्हाचा पारा चढत असताना रसाळीचे आग्रहाचे निमंत्रणाने पाहुणचार केला जात आहे.
आम आदमीला आमरसाचा दिलासा
त्र्यंबक वडसकर, परभणी उन्हाचा पारा चढत असताना रसाळीचे आग्रहाचे निमंत्रणाने पाहुणचार केला जात आहे. आंब्याच्या किंमतीमध्ये वाढ झाली नसल्याने आमरसाचा आमआदमीला दिलासा मिळत आहे. परभणीच्या बाजारपेठेत दशहरी, लंगडा, केशर, पायरी, आम्रपाली, हापूस असे विविध प्रकारचे आंबे दाखल झाले आहेत. गुजरात, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश आदी ठिकाणाहून या आंब्याची आवक झाली आहे. शहरातील विद्यापीठ गेट परिसरात आंबे विक्रेत्यांचे स्टॉल एक महिन्यापासून लागलेले आहेत. तसेच गांधीपार्क, बसस्थानक रोड आदी भागात आंबे विक्रेते दिसत आहेत. गावरान आंबे २० ते ५० रुपये किलो दराने विक्री होत आहेत. तर दशहरी, लंगडा, केशर यांचे दर ५० ते ७० रुपयांपर्यंत आहेत. मागील वर्षी ३०० रुपये किलो दराने विकल्या जाणारा हापूस १५० ते २०० रुपये किलो दराने विकला जात आहे. केशर, दशहरी, लंगडा या आंब्याकडे ग्राहकांचा जास्त कल दिसून येतो. आंब्याच्या विविध जाती बाजारात आल्या आहेत. काही व्यापारी आंब्यांना विशिष्ट पद्धतीने पॅकींग करून जास्त दराने विकताना दिसत आहेत. लोणच्यासाठी लागणार्या कैर्या २० ते ३० रुपये किलो दराने उपलब्ध झाल्या असून जून महिन्यात कैर्यांची किंमत वाढण्याची शक्यता असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. अक्षय तृतियापासून सुरू झालेल्या या रसाळीचा मोसम मृगनक्षत्रापर्यंत चलतो. यावर्षी आंब्याला मोहर चांगला आला होता. परंतु मध्यंतरी झालेल्या वादळी वारा, ढगाळ वातावरण व गारपिटीने आंबा पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्यामुळे जिल्ह्यासह मराठवाड्यातील आंब्याचे उत्पन्न कमी झाल्याचे सोपानकाका आवचार यांनी सांगितले. ज्याप्रमाणे आवळ्यावर विविध प्रक्रिया करून कँडी, ज्यूस तयार करतात. त्याप्रमाणे आंब्यावर प्रक्रिया करून आमरस, आम्रखंड यासह इतर वस्तू तयार करता येतील का? यावर विचार व्हायला हवा, असे मत अरूण चव्हाळ यांनी व्यक्त केले.