शहरातील सर्व जलकुंभ कोरडे
By Admin | Updated: September 17, 2014 01:16 IST2014-09-17T01:10:37+5:302014-09-17T01:16:40+5:30
औरंगाबाद : सणासुदीत शहर १५ सप्टेंबरपासून निर्जळीचा सामना करीत आहे. मंगळवारी शहरातील एकाही जलकुंभात पाणी नव्हते.

शहरातील सर्व जलकुंभ कोरडे
औरंगाबाद : सणासुदीत शहर १५ सप्टेंबरपासून निर्जळीचा सामना करीत आहे. मंगळवारी शहरातील एकाही जलकुंभात पाणी नव्हते. सर्व जलकुंभ कोरडे पडल्यामुळे गुंठेवारी वसाहतींमध्ये टँकरने होणारा पाणीपुरवठा झाला नाही. सिडको, हडकोसह शहरात पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागली.
पालिकेने या प्रकरणी काहीही माहिती पुरविली नाही, तर औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीने दिलेल्या माहितीत कुठलीही एकवाक्यता नव्हती. कंपनीच्या तांत्रिक आणि प्रशासकीय विभागात समन्वय नसल्याचे समोर आले असून, आज नागरिकांना महागडे टँकर घेऊन पाण्याची गरज भागवावी लागली.
१ दिवसाचे शटडाऊन घेण्यात येणार असल्याचे कंपनीने जाहीर केले होते. मात्र, दुसऱ्या दिवशीही जलवाहिन्यांच्या गळत्यांची कामे पूर्ण होऊ शकली नाहीत. त्यामुळे शहरात जायकवाडीतून पाणीपुरवठा झाला नाही.
परिणामी, सर्व जलकुंभ कोरडेठाक पडले होते. कोटला कॉलनी, क्रांतीचौक, एन-५, एन-६ येथील पम्पिंग स्टेशनवर टँकरने पाणी भरण्याची सुविधा आहे. मात्र, जलकुंभात पाणीच आले नसल्यामुळे टँकर तेथेच उभे होते.
कंपनीत समन्वय नसल्यामुळे शहरात पाण्याची बोंबाबोंब झाली. जायकवाडी सबस्टेशन, जायकवाडी नवीन व जुन्या योजनेचे तसेच ढोरकीन, फारोळा येथे पंप दुरुस्ती, व्हॉल्व्हची दुरुस्ती व काही यांत्रिकी, विद्युत उपकरणांच्या दुरुस्तीची कामे करण्यात आल्याचा दावा करण्यात आला असला तरी जलवाहिन्या कोरड्याच आहेत. रेल्वेस्टेशन ते ज्युबिली पार्कपर्यंत टाकण्यात आलेली ३८ कोटींची जलवाहिनी उद्या जोडण्यात येईल. तांत्रिक अभियंत्यांनी पाणीपुरवठा कधी होणार, या प्रकरणी काहीही स्पष्ट केले नाही. जायकवाडी ते शहरादरम्यान या जलवाहिन्यांवर विविध ठिकाणी मोठ्या स्वरूपाच्या गळत्या आहेत. त्यांची दुरुस्ती अजून सुरू असल्याचे कंपनी सूत्रांनी सांगितले.
नळांना पाणी आलेच नाही. शिवाय गुंठेवारी वसाहतींमधील टँकरही आज बंद होते. कं पनीचे अभियंता कोण आहेत, ते कुठे बसतात, याची कुठलीही माहिती नागरिकांना नसल्यामुळे ते जलकुंभावर हेलपाटे मारून वैतागून निघून गेले.
नागरिकांना महागडे टँकर घेऊन पाण्याची गरज भागवावी लागली. कंपनी आणि पालिका यांच्यात कोणतीही सुसूत्रता नसल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. फारोळा येथे केलेली जोडणी निखळली. एकीकडे कंपनीचा जनसंपर्क विभाग कामे झाल्याचे जाहीर करतो आहे, तर दुसरीकडे तांत्रिक विभाग अजूनही डागडुजीचे काम करीत आहे.