‘समृद्धी’च्या विरोधात १२ जून रोजी शेतकरी परिषद
By Admin | Updated: June 8, 2017 00:41 IST2017-06-08T00:38:44+5:302017-06-08T00:41:01+5:30
औरंगाबाद : समृद्धी महामार्गाच्या विरोधात शरद पवार यांच्या उपस्थितीत १२ जून रोजी सिडको नाट्यगृह येथे शेतकरी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे

‘समृद्धी’च्या विरोधात १२ जून रोजी शेतकरी परिषद
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : समृद्धी महामार्गाच्या विरोधात माजी केंद्रीय कृषिमंत्री तथा राष्ट्रवादी काँगे्रसचे अध्यक्ष खा.शरद पवार यांच्या उपस्थितीत १२ जून रोजी सिडको नाट्यगृह येथे शेतकरी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेला महामार्ग ज्या जिल्ह्यांतून जात आहे,अशा १० जिल्ह्यांतील शेतकऱ्यांची उपस्थिती राहणार असल्याचे संयोजन समितीने बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
आ.सतीश चव्हाण, आ.भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, माजी आ.कल्याण काळे, अभिजित देशमुख, कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस डॉ.भालचंद्र कांगो, प्रा.राम बाहेती, नाशिक जिल्ह्यातील शेतकरी विनायक पवार, कचरूडुकले, बबन हारणे यांची यावेळी उपस्थिती होती.
आ.चव्हाण यांनी सांगितले की, समृद्धी महामार्ग विरोधी कृती समिती या बॅनरखाली सर्व १० जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचे एकीकरण होणार असून, सर्व ते सर्वपक्षीय शेतकऱ्यांसाठी व्यासपीठ असणार आहे. १० जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचे मत ऐकल्यानंतर समृद्धीच्या बाबतीत खा.पवार निर्णायक आंदोलनाची भूमिका जाहीर करतील. ३० मे रोजी शेतकऱ्यांनी खा.पवार यांची भेट घेऊन समस्या मांडून या लढ्याचे नेतृत्व करावे, अशी विनंती शेतकऱ्यांनी केली होती.
भूसंपादन सक्तीने होत आहे. त्यामुळे मोबदल्याचा मुद्दा नंतर असेल मुळात शेतकऱ्यांना या मार्गासाठी जमीन द्यायची नाही. पोलीस बळाचा वापर केला जात आहे, रात्रभर आरोपींसारखे शेतकऱ्यांना डांबून ठेवले जात आहे.
जमिनीच्या मोजणीसाठी जाताना शेकडो पोलीस शेतकऱ्यांच्या दारात उभे केले जात आहेत. २०१३ च्या भूसंपादन कायद्याऐवजी १९५५ च्या भूसंपादन कायद्याची अंमलबजावणी शासन करीत आहे. काही मध्यस्थ मुली शेतकऱ्यांच्या कुटुंबात बुद्धिभेद करून जमिनी देण्यास भाग पाडत आहेत. या सगळ्या प्रकाराविरोधात शेतकऱ्यांची परिषद असल्याचे यावेळी सांगण्यात आले.