दोन महिन्यांपासून जलकुंभाचे पाईप नादुरूस्त
By Admin | Updated: May 23, 2014 00:23 IST2014-05-22T23:39:38+5:302014-05-23T00:23:05+5:30
जालना : नवीन कारागृहाजवळ तयार केलेल्या जलकुंभात दोन महिन्यांपासून साठाच होत नसल्याने शहरात कमी दाबाने व अनियमित पाणीपुरवठा होत आहे.

दोन महिन्यांपासून जलकुंभाचे पाईप नादुरूस्त
जालना : जायकवाडी - जालना पाणीपुरवठा योजनेअंतर्गत पाण्याचा साठा करण्यासाठी नवीन कारागृहाजवळ तयार केलेल्या जलकुंभात दोन महिन्यांपासून साठाच होत नसल्याने शहरात कमी दाबाने व अनियमित पाणीपुरवठा होत आहे. जायकवाडी योजनेस नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले. या योजनेद्वारे पूर्वीपेक्षा शहरास पाणी अधिक प्रमाणात मिळणार असल्याने नवीन कारागृह परिसरात पाण्याचा साठा करण्यासाठी एक जलकुंभ तयार करण्यात आला आहे. परंतु गेल्या दोन महिन्यांपासून या जलकुंभातील दोन पाईप नादुरूस्त झाल्याने तेथे साठा होईनासा झाला आहे. त्यामुळे इंदेवाडी जलकुंभातून या जलकुंभात पाणीपुरवठा न होता, तो जलवाहिनीद्वारे परस्पर शहरात पुरवठा केला जात आहे. त्यामुळे जलकुंभात साठा होत नाही. या जलकुंभाच्या परिसरात असलेल्या चार व्हॉल्वच्या पाईपलाही गळती लागल्याने पाणी वाया जात आहे. हे पाईन बदलून नवीन अंथरण्याचे काम सध्या सुरू आहे. परंतु जलकुंभाच्या दोन पाईपची दुरूस्ती अद्याप झालेली नाही. परिणामी शहरात अनियमित व कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. ऐन उन्हाळ्यात ही समस्या उद्भवल्याने बहुतांश भागातील नागरिकांना बोअरच्या पाण्यावरच अवलंबून रहावे लागत आहे. नगरपालिकेने ही अडचण त्वरित दूर करावी, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून होत आहे. दरम्यान, जायकवाडी- जालना पाणीपुरवठा योजनेतून जुना जालना भागास पाणी पुरवठा करण्यात येतो. कमी दाबाने व अनियमित पाणीपुरवठा करण्यात येत असल्यामुळे नागरिकाना दहा ते पंधरा दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. याकडे पालिकेने लक्ष देण्याची मागणी होत आहे. (प्रतिनिधी) प्रामुख्याने जलसाठ्यासाठी तयार करण्यात आलेल्या या जलकुंभात मागील दोन महिन्यांपासून पाणीसाठाच करण्यात आला नाही. पाईप फुटले असल्यामुळे संपूर्ण पाणी वाया जात आहे. या पाईपमधून कारंजाप्रमाणे पाणी उडत होते. तसेच या परिसरात मोठा तलाव निर्माण झाला होता. जलकुंभाप्रमाणेच तलावही कोरडा झाला आहे.