एक तपानंतर टँकरची संख्या घटली
By Admin | Updated: May 26, 2014 00:32 IST2014-05-26T00:02:13+5:302014-05-26T00:32:08+5:30
जालना : जिल्ह्यात एक तपानंतर ग्रामीण भागात पाणीपुरवठा करणार्या टँकरची संख्या घटली आहे. गेल्या बारा वर्षात किमान ३५ तर कमाल ५५२ टँकरद्वारे पाणीपुरवठा झाला.

एक तपानंतर टँकरची संख्या घटली
जालना : जिल्ह्यात एक तपानंतर ग्रामीण भागात पाणीपुरवठा करणार्या टँकरची संख्या घटली आहे. गेल्या बारा वर्षात किमान ३५ तर कमाल ५५२ टँकरद्वारे पाणीपुरवठा झाला. मात्र यावर्षी केवळ सहाच टँकर सुरू असल्याचे जिल्हा परिषदेतील ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील सूत्रांनी सांगितले. उन्हाळा आणि पाणीटंचाई असे जालना जिल्ह्याचे समीकरणच झाले होते. त्यामुळे दरवर्षी उन्हाळ्यातील टंचाईला तोंड देताना प्रशासकीय यंत्रणेला नाकीनऊ येत असत. टंचाईग्रस्त गावांमध्ये टँकरद्वारे किंवा त्या परिसरातील विहिर अधिग्रहण करून पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न होत होता. गतवर्षी महाराष्ट्रात भयावह दुष्काळाची स्थिती जिल्ह्यातच होती. पाणी कोठून आणावे, असा संभ्रम निर्माण झाला होता. परंतु जिल्हा प्रशासनाने केलेल्या विविध उपाययोजनांमुळे लोकांना काहीसा दिलासा मिळाला. जि.प.च्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने २४ साठवण तलावात २४ चर खोदले. जाफराबाद येथे तात्पुरत्या पूरक नळयोजनेमुळे ३९ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे शक्य झाले. निम्न दुधना प्रकल्पात चर खोदून परतूर व मंठा तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करता आला. जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याच्या विहिरीने खोलीकरण व आडवे बोअर घेण्यात आल्याने व यावर्षी पर्जन्यमान चांगले झाल्याने तलावांची, जलाशयांची पाणी पातळी वाढली. ही पातळी वाढल्याने तलावांमध्ये मे महिन्याच्या अखेरीस देखील पाणी साठा आढळून येत आहे. अन्यथा एप्रिलमध्येच बहुसंख्य तलाव कोरडे पडतात. विशेषत: घाणेवाडी जलाशयातील गाळ मोठ्या प्रमाणावर काढण्यात आल्याने या जलाशयात १३ फुटांपेक्षा अधिक पाणी आहे. त्यामुळे जालनेकरांच्या पाण्याचा मूळ स्त्रोत अद्याप सुरक्षित असल्याचे नागरिकांमध्ये बोलले जाते. (प्रतिनिधी)जालना नगरपालिकेने घाणेवाडी जलाशयात चर खोदल्याने तेथून दररोज किमान ८० टँकरद्वारे शहराला पाणीपुरवठा करण्यात आला. त्यामुळे शहरातील नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला होता. गतवर्षी दुष्काळात चर खोदणे, आडवे बोअर घेणे अशा विविध उपाययोजनांमुळे तसेच पर्जन्यमान चांगले झाल्यामुळे यावर्षी टंचाईची स्थिती कमी प्रमाणात असल्याचे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एस.एम. कदम यांनी सांगितले. जिल्ह्यात वर्षनिहाय पाणीपुरवठा करणार्या टँकरची संख्या वर्ष टँकर संख्या २००७-०८ २०१ २००८ -०९ २४३ २००९ -१० १५० २०१० -११ ०३५ २०११-१२ १०३ २०१२-१३ ५५२ २०१३-१४ ००६ (२३ मे पर्यंत)