पाणंदमुक्तीपाठोपाठ लोळदगावची वाटचाल आता दुष्काळमुक्तीकडे !
By Admin | Updated: December 28, 2015 00:22 IST2015-12-27T23:59:17+5:302015-12-28T00:22:06+5:30
बीड : तीन महिन्यात शंभर टक्के पाणंदमुक्त झालेल्या लोळदगावने आता जलसंधारणासाठी ‘नाम’ फाऊंडेशनच्या मदतीने पाऊल उचलले आहे.

पाणंदमुक्तीपाठोपाठ लोळदगावची वाटचाल आता दुष्काळमुक्तीकडे !
बीड : तीन महिन्यात शंभर टक्के पाणंदमुक्त झालेल्या लोळदगावने आता जलसंधारणासाठी ‘नाम’ फाऊंडेशनच्या मदतीने पाऊल उचलले आहे. बंधाऱ्याच्या दुरुस्तीसह गावाजवळून जाणाऱ्या नदीपात्राचे खोलीकरण, रुंदीकरण व सरळीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. त्यामुळे एक हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
अभिनेता नाना पाटेकर, मकरंद अनासपूरे या जोडगोळीने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना सर्वात आधी रोख आर्थिक मदत करुन मनाची श्रीमंती दाखविली होती. दुष्काळग्रस्तांना दिलासा देण्यासाठी त्यांनी ‘नाम’ फाऊंडेशनची मुहूर्तमेढ रोवली. ‘नाम’च्या जलसंधारण कामाचा नारळ लोळदगाव येथे नुकताच फुटला होता. लोळदगाव येथील जमीन काळीभोर व सुपीक;परंतु सततच्या दुष्काळी स्थितीने लागवड खर्चही पदरात पडणे मुश्किल बनलेले. बिंदूसरा नदीतील पाणी आले तसे वाहून जात होते. या पार्श्वभूमीवर ‘नाम’ ने येथे सुरु केलेली जलसंधारणाच्या कामांना महत्त्व प्राप्त झाले आहे. तीन कि़ मी. अंतरापर्यंत नदीचे सरळीकरण होत असून खोलीकरण व रुंदीकरणाचे कामही प्रगतीपथावर आहे.
बंधाऱ्याची डागडुजी
बिंदूसरा नदीवर १९९६ मध्ये कोल्हापुरी बंधारा बांधलेला होता;परंतु गेल्या काही वर्षांपासून बंधाऱ्याची पुरती दुरवस्था झाली होती. भगदाड पडल्याने पाणी टिकत नव्हते. या बंधाऱ्याची दुरू स्ती केली जात असून त्यामुळे पाण्याची बचत होण्यास मदत होणार आहे.
१०० किमीपर्यंतची कामे करणार
‘नाम’ फाऊंडेशनच्या वतीने जिल्ह्यातील १०० किमी अंतरापर्यंत नदीपात्रांचे रुंदीकरण, सरळीकरण व खोलीकरणाची कामे जूनपूर्वी पूर्ण केली जाणार आहेत. राज्य समन्वयक शेषेराव आघाव यांनी जिल्ह्याला २० पोकलेन यंत्र व इतर सामुग्री देण्याचे जाहीर केले आहे. मराठवाडा समन्वयय राजाभाऊ शेळके हे या कामांवर नियंत्रण ठेवून आहेत. लोळदगाव सोबतच पिंपळनेर, तरडगव्हाण आदी गावांतही कामे वेगाने सुरु आहेत.
गावकरीही सरसावले
‘नाम’ने पुढाकार घेऊन सुरु केलेल्या जलसंधारण कामाला लोळदगाव ग्रामस्थांनीही बळ दिले आहे. चार लाखांपेक्षा अधिक रक्कम लोकसहभागातून उभी केली आहे. शिवाय श्रमदानही होतेय. (प्रतिनिधी)