लोखंडी दरवाजावरुन प्रशासनाची कोंडी
By Admin | Updated: June 22, 2016 00:54 IST2016-06-22T00:47:06+5:302016-06-22T00:54:21+5:30
औरंगाबाद : कधी कोल्हापुरी बंधाऱ्यांच्या गेटवरून, तर कधी मागील सभेच्या अपूर्ण कार्यवृत्तांतावर प्रशासनाला कोंडीत पकडून जि.प. सदस्यांनी मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत अधिकाऱ्यांना घाम फोडला.

लोखंडी दरवाजावरुन प्रशासनाची कोंडी
औरंगाबाद : कधी कोल्हापुरी बंधाऱ्यांच्या गेटवरून, तर कधी मागील सभेच्या अपूर्ण कार्यवृत्तांतावर प्रशासनाला कोंडीत पकडून जि.प. सदस्यांनी मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत अधिकाऱ्यांना घाम फोडला.
जि.प. अध्यक्ष श्रीराम महाजन यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा झाली. या सभेस उपाध्यक्ष दिनकर पवार, सभापती विनोद तांबे, संतोष जाधव, शीला चव्हाण, सरला मनगटे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अभिजित चौधरी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश बेदमुथा तसेच सभेचे सदस्य सचिव तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांची प्रमुख उपस्थिती होती. सुरुवातीलाच सदस्य रामदास पालोदकर, दीपकसिंह राजपूत, मनाजी मिसाळ या सदस्यांनी मागील सभेचा इतिवृत्तांत अपूर्ण आहे, ही बाब निदर्शनास आणली. अनिलकुमार चोरडिया व अन्य सदस्यांनी मुद्दा उपस्थित केला की, अलीकडेच जिल्हा परिषदेत तीन कर्मचारी व एका अधिकाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. या घटनांमुळे जि.प.चे वाभाडे निघाले आहेत, यासंदर्भात प्रशासनाने खुलासा करण्याची मागणी केली. तेव्हा सभेचे सदस्य सचिव वासुदेव सोळंके यांनी भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही, याची दक्षता घेण्याचे आदेश दिले.
दीपकसिंह राजपूत यांनी पुन्हा एकदा ग्रामपंचायतींना कोणती कामे द्यावीत व कोणती नको, हा मुद्दा चर्चेला आणला. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश बेदमुथा यांनी सांगितले की, घटना हीच सर्वश्रेष्ठ आहे; पण ग्रामपंचायतींनी करावयाच्या कामांसंबंधी शासनाच्या काही सुधारित सूचना असतील, तर त्यासंबंधी शासनाकडून मार्गदर्शन मागवतो. प्रशासनाने केलेल्या या खुलाशावर सभागृहातील सदस्यांनी गदारोळ केला. कोल्हापुरी बंधाऱ्यांसाठी गेट खरेदीच्या प्रस्तावास सर्वसाधारण सभेची मान्यता घेण्याचा विषय चर्चेला आला. याबाबत सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले.
गेट बसविल्या जाणाऱ्या बंधाऱ्यांची तालुकानिहाय स्थिती सांगण्याचा आग्रह सदस्यांनी धरला. तेव्हा प्रारंभी १५० बंधाऱ्यांना कमीत कमी ३ दरवाजे बसवले जातील, असे सांगून यादी जाहीर केली. त्यामध्ये सिल्लोड तालुक्यातील ५१ बंधारे, सोयगाव- १४, फुलंब्री- ६, कन्नड- ३५, खुलताबाद- ३, गंगापूर- ९, वैजापूर- १६, पैठण- १० आणि औरंगाबाद तालुक्यातील ४ बंधाऱ्यांचा समावेश होता. तेव्हा एकट्या सिल्लोड तालुक्यातील ५१ बंधाऱ्यांना गेट बसविले जाणार ही बाब समोर आली. यावरून सदस्यांनी अध्यक्षांनाही घेरण्याचा प्रयत्न केला.